राजूर : राज्यातील सर्वात उंचीच्या कळसूबाई शिखरावर विद्युत पुरवठा करण्यात आला असून, शनिवारी या कामाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाले.यावेळी जि. प. सदस्य वैभव पिचड, वीज वितरणचे मुख्य अभियंता के. जी. अंजनाळकर, अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, कार्यकारी अभियंता गोसावी, उपअभियंता बाडसकर, योजना तयार करणारे सहाय्यक अभियंता सचिन पवार, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड, सीताराम गायकर, गिरजाजी जाधव, मिनानाथ पांडे आदी उपस्थित होते.या शिखरावर वीज पुरवठा करण्याचे आव्हानात्मक काम वीज वितरण कंपनीने तीन महिन्यांत पूर्ण केले. शिखराच्या पायथ्यापासून ११ केव्ही दाबाची ३ किमी लांबीची दुहेरी भूमिगत वाहिनी टाकत व ६३ केहीए क्षमतेच्या रोहित्राद्वारे वीज पुरवठा शिखरापर्यंत पोहचविण्यात आला आहे.यावेळी मंत्री पिचड म्हणाले की, गडावर जाण्यास पायऱ्या, शिड्या तयार करण्यात आल्यानंतर येथे वीज पुरवठा करणे हे आव्हानात्मक काम होते. या वीज पुरवठ्यामुळे पर्यटकांची व भाविकांची सोय होणार आहे. शिखरावर पोहचण्यासाठी रोपवे तयार करण्यात येणार असून, त्याच्या सर्वेक्षणासाठी पर्यटन विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. (वार्ताहर)
कळसूबाई शिखरावर वीजपुरवठा सुरू
By admin | Updated: June 22, 2014 00:22 IST