पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील संपूर्ण मठवस्ती तीन दिवसांपासून अंधारात आहे.
तीन दिवसांपूर्वी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासही बंद आहे. वीजपुरवठा नसल्याने येथील वस्तीवरील लोकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. संपूर्ण वस्तीसाठी एकच रोहित्र असल्याने यावर प्रचंड ताण येतो. शिवाय महामार्गालगत हाॅटेलची संख्या जास्त असल्याने मोठा ताण येतो. असा प्रकार वारंवार होत असल्याने महामार्गालगत दोन्ही बाजूला दोन अशा वेगवेगळ्या रोहित्राची मागणी प्रगतिशील शेतकरी संजय तरटे यांनी केली आहे. सध्या कांदा, ज्वारीसाठी पाणी भरणे लांबल्याने पिके सुकू लागली आहेत. शाळा बंद असल्याने मुलांचा ऑनलाइन अभ्यास मोबाइलवर अवलंबून आहे. वीज नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात वीज कार्यालयाशी संपर्क केला असता अजून दोन दिवसांनी डीपी मिळणार असल्याचे अभियंता रुद्राकर यांनी सांगितले.