अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर मनसेतील गटबाजी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ उमेदवारीची मागणी करण्यावरून मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत कमालीचे मतभेद असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या मुलाखतींवरून स्पष्ट झाले असून, तिघांनी एकत्रित तर एका ज्येष्ठ नेत्याने स्वतंत्र मुलाखत दिली आहे़ त्यामुळे मनसेत उमेदवारीवरून चांगलाच गृहकलह निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे़महापालिका निवडणुकीपासून शहर मनसेत गट निर्माण झाले आहेत़ या गटबाजीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकारिणी फे रबदलाचा उतारा काढला़ कार्यकारिणीत जुन्या नेत्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली़ त्यामुळे जुने आणि नवे असा, वाद निर्माण झाला़ पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षात स्थान मिळविण्यासाठी आटापिटा सुरू आहे़ विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्याच मर्जीतील उमेदवार हवा आहे़ उमेदवारीसाठी नुकत्याच झालेल्या मुलाखतीच्यावेळी ते दिसूनही आले़ शहर मतदारसंघातून किशोर डागवाले, गणेश भोसले आणि सतीश मैड यांनी एकत्रित उमेदवारीची मागणी केली़ एवढेच नव्हे तर जनमत चाचणी घेऊन उमेदवार द्या, असा आग्रहही त्यांनी धरला़ यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ सर्व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन तिघांनी पक्षातील इतरांना एकप्रकारे धक्काच दिला आहे़ शहर वगळता इतर सर्व मतदारसंघातील मुलाखती सुरळीत पार पडल्या़ मात्र शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणेदुणे काढत मुलाखती दिल्या आणि अखेर सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन उमेदवार देण्याची मागणी केली़ यावेळी काहींनी पक्षातील कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली असून, यातून पक्षश्रेष्ठी काय मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)
मनसेत गृहकलह
By admin | Updated: July 16, 2014 00:45 IST