बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा‘रासपा’ चे अध्यक्ष महादेव जानकर यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्याने त्यांचे खंदे समर्थक ‘रासपा’ चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांची श्रीगोंद्यातील राजकारणाची तटबंदी मजबूत होण्यास मदत होणार आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्याची जागा नाहाटा यांना मिळावी म्हणून जानकरांनी ताकद लावली होती, मात्र भाजपाने ही जागा पाचपुतेंमुळे सोडली नाही. अखेर भाजपाला श्रीगोंद्यात हार पत्करावी लागली. विधानसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज न होता नाहाटा यांनी पक्षाचा विचार घराघरात पोहचविला. परंतु मोदीच्या लाटेत रासपाला मोठे यश मिळाले नाही. तरीही जानकर, नाहाटा यांनी संघटन कौशल्याच्या बळावर मंत्री पदासाठी फिल्डींग लावली. जानकर यांचे श्रीगोंदा तालुक्याचे पूर्वाश्रमीचे घनिष्ठ संबंध आहेत. अशा परिस्थितीत नाहाटांना जानकरांच्या माध्यमातून विकास कामे करण्याची मोठी संधी आली. नाहाटा यांचे सर्वच पक्षात मोठा मित्र परिवार असल्याने त्यांनी राजकारणात निरनिराळी पदे भूषविली. आता जानकरांच्या रूपाने मंत्रालयात प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांना हक्काचा मंत्री मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. राम शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती व महादेव जानकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचे समजताच श्रीगोंदा, काष्टी, लोणीव्यंकनाथ, हंगेवाडी, भावडी, वांगदरी, हिंगणी या गावात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. धनगर समाजाचे नेते आबासाहेब कोल्हटकर व दत्तात्रय गावडे म्हणाले, धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्रिपद देऊन भाजपाने धनगर समाजाचा सन्मान केला आहे. मात्र धनगर समाजाला आरक्षण दिल्यास या मंत्रिपदाचे फलित होईल. महादेव जानकर यांचे श्रीगोंदा तालुक्यावर सुरूवातीपासून प्रेम आहे. जानकर यांची कॅबिनेट मंत्री म्हणून लागलेली वर्णी हा सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. हे मंत्रिपद श्रीगोंद्यालाच मिळाले आहे यांचा विशेष आनंद आहे. -बाळासाहेब नाहाटा, प्रदेशाध्यक्ष रासपा
जानकरांचे मंत्रिपद नाहाटांना फलदायी
By admin | Updated: July 8, 2016 23:33 IST