अहमदनगर : गांधी साहेबांच्या मंत्रिपदाचे काही कळले का, कोणते खाते मिळेल हो, त्यांचे नाव बाजूला पडलंय खरंय का? अशा आशयाचे दूरध्वनी भाजपा कार्यालय, गांधींच्या निवासस्थानी आणि प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात दिवसभर येत होते. शहरात, जिल्ह्यात ठिकठिकाणी तशी चर्चाही रंगली होती. दिवसाच्या तिसर्या प्रहरापासून गांधींचे नाव वृत्तवाहिन्यांमध्ये झळकेनासे झाले आणि समर्थकांचा उत्साह मावळत गेला. गांधींना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले. मंत्रिपदाचा निर्णय टांगणीला लागल्याने भाजपासमर्थक आणि नगरकरांच्या आनंदोत्सवाला ‘ब्रेक’ लागला. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी सायंकाळी शपथ घेणार असल्याने संपूर्ण देशाचे तिकडे तर नगरकरांचे गांधींच्या मंत्रिपदाकडे लक्ष लागले होते. भाजपा कार्यकर्ते, नेते गेल्या आठ दिवसांपासूनच आनंदात आहेत. कार्यालयासमोर, चौकाचौकात त्यांनी फटाके फोडले. भाजपा कार्यालय परिसरात शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, नगरसेवक सुवेंद्र गांधी, संपत नलावडे आदींनी पेढे वाटून आनंद साजरा केला. एकीकडे मोदींच्या शपथविधीचा आनंद तर दुसरीकडे गांधींना डावलल्याने नाराजी असे संमिश्र वातावरण नगर भाजपामध्ये होते. गांधी हे वाजपेयी सरकारमध्ये जहाज बांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. मागील अनुभव पाहता त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती.(प्रतिनिधी) सभास्थानी रांगोळी नगरमध्ये प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. त्या ठिकाणी आज सडासमार्जन करून रांगोळी काढली होती. रांगोळीतून मोदींचे चित्रही रंगवले होते. कोणी मोबाईलवर मेसेजद्वारे शपथ ग्रहण सोहळ्याचा वेळ सांगत होते तर कोणी काम आटोपून टी.व्ही.समोर जाऊन बसले होते. मात्र, सोहळा सुरू होताच शहरातील अनेक भागातील वीज गायब झाली. मोदींचा शपथ सोहळा नगरकरांना पाहायचा आहे. त्यामुळे भारनियमन करू नका. आता आमचे सरकार आले आहे, हे ध्यानात ठेवा असे आमदार राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकार्यांना बजावले होते. स्वकियांचा विरोध? गांधींना मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक नेटाने कामाला लागले होते. गेल्या दोन दिवसांत त्यांची वरिष्ठ पातळीवर मेलामेली सुरू होती. उमेदवारी मिळवतानाही त्यांना अशाच विरोधाला तोंड द्यावे लागले होते. अर्बन बँक प्रकरण, त्यांची कार्यपद्धती यावरही काही नेत्यांनी आक्षेप नोंदवला. तशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरू होती. मोदींच्या यंत्रणेने पाठवलेला निवडणुकीतील रिपोर्टही गांधींना डावलण्यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते. गांधी समर्थकांना मात्र मंत्रिपद पुढील विस्तारावेळी मिळेल अशी आशा आहे.
गांधींचे मंत्रिपद टांगणीवर!
By admin | Updated: May 27, 2014 00:30 IST