अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जात प्रमाणपत्र निर्धारित वेळेच्या आत न मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते फेटाळले. यामुळे भातोडी पारगाव ग्रामपंचायतीच्या उमेदवार माया संजय जगताप आणि त्यांच्या गटाचे उमेदवार सुरेश भोसले यांनी नायब तहसीलदारांच्या समोरच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल प्रभाकर गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विष घेणाऱ्या दोन्ही उमेद्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर तालुक्यातील भातोडी पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीची सध्या प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होती. अनुसूचित जाती-जमातीचे उमेदवार असल्यास त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी छाननी प्रक्रियेच्या दिवशी दुपारी तीनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या निर्धारित वेळेत उमेदवार माया जगताप या जात प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. जात प्रमाणपत्र घ्यावे अन्यथा येथेच आत्महत्या करण्याची धमकी माया जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली. मात्र कायद्याप्रमाणेच कार्यवाही करण्यात आल्याने अर्ज वैध ठरविला जाणार नाही, असे गोरे यांनी बजावले. मात्र त्यांचे न ऐकता जगताप यांनी तहसील कार्यालयातच विष घेतले. जगताप यांच्या गटाचे उमेदवार सुरेश भोसले यांनीही विष घेतले. या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. त्या दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी गोरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन्ही उमेदवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे यांनी दिली. (प्रतिनिधी)गोंधळ उडालाउमेदवार माया जगताप यांचे पती संजय जगताप हे भातोडी पारगावचे माजी सरपंच आहेत. तसेच ते पंचायत समितीचे सदस्य होते. जगताप यांच्याच गटाच्या एका उमेदवाराचा अर्ज स्वीकारला आणि दुसऱ्याचा अर्ज स्वीकारला नसल्याने तहसील कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता.
अर्ज न स्वीकारल्याने विष प्राशन
By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST