अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्गंत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानाचे २०१४-१५ साठी ७३ कोटी २१ लाख रुपयांच्या बजेटला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेकडून ८२ कोटी ७१ लाख रुपयांचे बजेट केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले होते. जिल्हा परिषदेने पाठविलेल्या बजेटमधून सुमारे ९ कोटी रुपयांला केंद्राने कात्री लावलेली आहे. दरवर्षी ३१ मार्चपर्यंत हे बजेट मंजूर होऊन जिल्हा परिषदेला प्राप्त होत असते. यंदा मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बजेट मंजुरीस जून महिना उजाडला आहे. या बजेटमध्ये पाठ्यापुस्तके, गणवेश, शाळा बाह्य मुलांना विशेष प्रशिक्षण देणे, शाळेतील ग्रंथालय, शिक्षक अनुदान, शाळा अनुदान, शाळा खोल्या देखभाल दुरूस्ती, अपंग समावेश शिक्षण, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी आणि शाळा खोल्या बांधकाम यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून हे बजेट तयार करून मंजुरीसाठी महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांच्याकडे पाठविण्यात येते. त्या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेकडून हे बजेट केंद्र सरकारकडे पाठविण्यात येते. त्या ठिकाणी शाळा बांधकाम वगळता अन्य विषयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यात हे बजेट तयार करून शिक्षण परिषदेला पाठविले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचरसंहिता लागू झाल्याने बजेट १८ जूनला मंजूर करण्यात आले आहे. या बजेटमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश पुरविणे, विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता, ५ हजार २४० कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारासाठी, १ हजार ६०० शाळा बाह्य मुलांसाठी, १०० ठिकाणी अतिरिक्त खोल्या बांधण्यासाठी, ५४ हजार २६६ शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
‘सर्व शिक्षा’च्या बजेटला ९ कोटींची कात्री
By admin | Updated: June 20, 2014 00:37 IST