किशोर वंजारी - नेर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना सध्या बदलीचे वेध लागले आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बदल्या सध्या प्रत्येक तालुक्यात सुरू आहे. तालुक्याचा कोरम पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. मात्र एकाच तालुक्यात राहून राजकारण करणार्या अनेक शिक्षकांना या बदल्या नको आहे. त्यामुळेच बदली थांबविण्यासाठी शिक्षकांनी विविध क्लृप्त्या अवलंबने सुरू केले आहे. मात्र ज्यांच्याकडे वशीला, अपंगांचे प्रमाणपत्र नाही, अशांचे देऊळ पाण्यात आहे. जिल्ह्यातील आठ हजार शिक्षकापैकी अतिरिक्त शिक्षक बदली होऊन जाणार आहे. मात्र राजकारणात सक्रिय सहभाग घेणार्या शिक्षकांना बदल्या नको आहे. शहरातील काही शिक्षकांनी यासाठी विविध प्रयोग सुरू केले आहेत. सहा शिक्षकांनी संघटना जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीचे आपण उपाध्यक्ष असल्याचे नियुक्तीपत्र आणले आहे. याशिवाय अपंग, पत्नी अपंग, परिवारातील व्यक्तिचे आजारपण, बनावट प्रमाणपत्र सादर करणे सुरू केले आहे. याशिवाय वशिलेबाजीचाही आधार घेतला जात आहे. एवढी सारी सर्कस करूनही जमले नाही तर चिरीमिरी दिली जात आहे. विद्यादानाच्या कार्यात कसर सोडणार्या शिक्षकांनी राजकीय पुढार्यांमार्फत बदली थांबविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात सध्या यासाठी काही शिक्षक संघटनाही पुढे सरसावल्या आहे. दबावतंत्राचा वापर करून नियोजित बदल्या रद्द करण्याचे नवे तंत्र अवलंबिले जात आहे. मुळात अन्यायाविरुद्ध लढणार्या या संघटना गैरमार्गाला कशी साथ देत आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात प्रामाणिकपणे सेवा देणार्या आणि कुठलाही वशिला न लावणार्या शिक्षकांवर मात्र अन्याय होत आहे. याशिवाय विविध खासगी संस्थांमध्येही बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. याठिकाणी कार्यरत शिक्षकही संस्थाध्यक्ष किंवा पदाधिकार्यांमार्फत आपली बदली थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याचा प्रकार उघड झाला होता. या वेळीसुद्धा असाच प्रकार होत आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
बदली थांबविण्यासाठी विविध क्लृप्त्यांचा अवलंब
By admin | Updated: May 12, 2014 00:19 IST