यवतमाळ : यवतमाळ शहरात काही महिन्यापूर्वी महाबीजचे बिजोत्पादन केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रांच्या नियंत्रणात जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर शेतकरी बियाणे निर्मितीचा प्रयोग राबविणार आहे. महाबिजची यंत्रणा त्याकरिता शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहे. खासगी बियाणे कंपन्या आपल्या मालकीच्या कार्यक्षेत्रात बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबवितात. त्याचा नफा स्वत:च्या खिशात ओढतात. मात्र राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाबीज कंपनीने शेतकर्यांना बियाणे निर्मितीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकर्यांच्या शेतात सीडचे प्लॉट लावण्यात येणार आहे. त्याला योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. तयार झालेले बियाणे प्रक्रियेत पास झाल्यास बाजार दरापेक्षा २० टक्के अधिक दराने शेतकर्यांकडून खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी तीन हजार हेक्टरचे नियोजन जिल्ह्याकरिता महाबीजने तयार केले आहे. तीन हजार हेक्टरवर बियाणे निर्मितीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत दीड हजार हेक्टरवर बियाणे लागवड करण्यास शेतकर्यांनी पुढाकार दर्शविला आहे. यामध्ये सोयाबीन आणि तुरीचा समावेश आहे. पुढाकार दर्शविणार्या शेतकर्यांना बियाणे महाबीज कंपनी देणार आहे. याला जिल्ह्यातील शेतकरी कसा प्रतिसाद देतात यावर या प्रक्रियेचे यश अवलंबून राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. (शहर वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्यांची निर्मिती
By admin | Updated: May 10, 2014 02:31 IST