प्रलंबित प्रश्न : सर्वपक्षीय नेत्यांचा समावेशमहागाव : तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या घरावर रविवारी, २६ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंबंधीचे निवेदन शनिवारी तहसीलदारांना देण्यात आले.मोर्चासाठी पाचही जिल्हा परिषद सर्कलमधील सदस्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हिवरा, गुंज, सवना, काळी (दौ) परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांपासून पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्यामुळे दुष्काळी निधी हेक्टरी २० हजार रुपये देण्यात यावा, राष्ट्रीय पीक विमा कंपनीकडून २०१५ चा विमा अत्यंत कमी मंजूर झाला आहे. तो वाढवून देण्यात यावा, सर्वच थकीत शेतकऱ्यांना २००८ ते २०१६ पर्यंत कर्ज पुनर्गठनाचा लाभ देण्यात यावा, मुद्राकर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. मोर्चाचे आयोजन प्रा. शिवाजी राठोड, सीताराम पाटील ठाकरे, संदीप ठाकरे, साहेबराव पाटील ठाकरे, स्वप्नील अडकिणे, डॉ. धोंडीराव बोरूळकर, शिवाजी देशमुख सवनेकर, सुनील राठोड, आरिफ सुरैया, शैलेश कोपरकर, डी.बी. नाईक, प्रमोद भरवाडे, सतीश नरवाडे, समाधान ठाकरे, रामराव पाटील नरवाडे, सुनील नरवाडे, नंदा महाजन, योगेश बाजपेयी, राजू राठोड, सुनील चव्हाण, देवीदास मोहकर, सुनील भरवाडे, संतोष गंधारे, जगदीश नरवाडे, उदय नरवाडे आदींनी केले आहे. या मोर्चासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, परिवर्तन, जनआंदोलन आधार संघर्ष समिती आदींनी पुढाकार घेतला आहे. मोर्चाचे स्वरूप पाहता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)
आमदारांच्या घरावरील मोर्चासाठी निवेदन
By admin | Updated: June 26, 2016 02:27 IST