यवतमाळ : मोर्चे, आंदोलने, राजकीय नेत्यांचे दौरे, सण, उत्सव आणि निवडणूक बंदोबस्त. त्यातच तोकडे आणि नवखे अधिकारी. अशा विपरीत परिस्थितीत पोलिसांना काम करावे लागते. पोलिसांची एनर्जी बंदोबस्तातच खर्ची होत असेल तर, सांगा गुन्हय़ांचा तपास करायचा केव्हा. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे हे शब्द वरकरणी घोंगडे झटकणारे वाटत असले तरी, हे वास्तव आहे. एक ना अनेक प्रश्नांचा सामना करीत पोलीस कर्तव्य बजावत आहे. वर्षभरापासून यवतमाळ शहर, वडगाव रोड, यवतमाळ ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, जबरी चोर्या, वाटमार्या, दरोड्याच्या गुन्हय़ात कमालीची वाढ झाली आहे. वर्षभराच्या कालावधीत सुमारे अडीच कोटींच्यावर सोन्या चांदीचे दागिने आणि रोख चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनांवर नियंत्रण तर सोडा यातील एकही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी नुकतेच यवतमाळ दौर्यावर येऊन गेले. या वेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पाचही उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि प्रमुख ठाणेदारांची बैठक घेतली. घरफोडी, जबरी चोर्या, वाटमार्या आणि दरोड्याच्या घडलेल्या एकाही गुन्हय़ाचा छडा लागला नसल्याच्या बाबीवर यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (स्थानिक प्रतिनिधी)
पोलिसांची एनर्जी बंदोबस्तातच खर्ची
By admin | Updated: May 13, 2014 00:12 IST