राळेगावात हळहळ : तरुणाच्या जाण्याने अशिक्षित आई-वडील निराधारराळेगाव : उमरेड येथील आशीष अरूण कचवे (२०) या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी सकाळी केलेल्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जीवनात काहीतरी चांगले करू पाहणाऱ्या या तरुणाने अचानक जगातून ‘एक्झिट’ घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दहावी पास झाल्यानंतर त्याची पुढील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. घरात आजीच्या नावे ५.१७ हेक्टर शेत जमीन आहे. ही शेती त्याचे वडील वहीत करीत होते. वडील, आई, आजी अडाणी असल्याने त्या तुलनेत घरातील हा तरुण मुलगा थोडाफार शिक्षित होता. त्याच्या खांद्यावर अवेळीच शेतीचाही भार काही वर्षांपासून आला होता. शेतीचा गाडा तो कसा तरी गेल्या काही दिवसांपासून ओढत होता. आजीच्या नावावरील शेतीवर एक लाख ४६ हजार इतके कर्ज होते. रिधोरा सोसायटीचे हे कर्ज थकित होते. या शिवाय काही खासगी कर्जही त्याच्याकडे थकित होते. फवारणीच्या औषधांची व मजुरांच्या मजुरीची कशी जुळवणी करावी या विवंचनेत तो घटनेच्या दिवशी शेतात बसून होता, अशी माहिती मिळाली आहे. यातच त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. घरी आई, वडील, आजी, लहान भाऊ असे सदस्य आहेत. म्हातारपणाची त्यांची काठी हिरावल्या गेली आहे. यावर्षी शेतात तूर व कापसाचे पीक उभे आहे. उत्पन्न बऱ्यापैकी होईल असा सर्वांचा अंदाज होता. त्यातच शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनाही सुरू केल्या. असे असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे, तरीही इतका टोकाचा निर्णय आशीषने का घेतला, असा प्रश्न सर्वत्र चर्चील्या जात आहे. नागपंचमीच्या सणाला मजुरांचा चुकारा देणे अशक्य होते. या विवंचनेतूनही आशीषने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. एसडीओ जनार्दन विधाते व सहकाऱ्यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली व सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)
धडपडणाऱ्या शेतकरीपुत्राची करूण ‘एक्झिट’
By admin | Updated: August 23, 2015 02:39 IST