संतोष तांगडे - बोरीअरब
लगतच्या जवळगाव येथे डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. दरम्यान नम्रता श्रीराम वाटोळे या १३ वर्षीय बालिकेचासुद्धा डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याच्या शंकेला वाव आहे. आरोग्य विभागाकडून या गावाला भेट ही देण्यात आली मात्र बालकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, जवळपास शंभर बालके आजारी असल्याचे वास्तव पुढे आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जवळगावात दहशतीचे वातावरण आहे. जवळगावामध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्यामुळे अनेक बालके आजारी पडली. जवळपास 25 बालकांना डेंग्यूसदृश आजार झाल्याचे निदान ही करण्यात आले. दररोज पाच ते सात नवीन बालरुग्णांना उपचारासाठी यवतमाळ येथे भरती करण्यात येते. या रोगाची लागण पिण्याच्या पाण्यामुळे झाली असल्याचा जावई शोध लावण्यात येत आहे. मात्र याच विहिरीवरुन झोपडपट्टी परिसरातील नागरिक पाणी पितात. त्यांच्याकडील कुणालाच या रोगाची लागण झालेली नाही, हे विशेष. गावाशेजारी असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे तर ही लागण झाली नसावी ना असा संशय नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे. दररोज बालके आजारी पडत असल्यामुळे बालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही लागण इतर बालकांना होऊ नये म्हणून बालकांना शेजारच्या नातेवाईकांकडे पाठविण्यात येत आहे. जवळगावमध्ये डेंग्यू सदृश आजाराची लागण लागण्याच्या एक आठवडा आधी नम्रता श्रीराम वाटोळे (१३) हिचा आजारी पडल्यानंतर मृत्यू झाला. नम्रता ही तिचे मामा गणेश देवराव कासारकर यांचेकडे शिक्षणासाठी राहत होती. डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याच्या चर्चेच्या आठ दिवस आधी नम्रता आजारी पडली होती. कासारकर यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे नम्रतावर बोरी येथे उपचार करण्यात आले. मात्र चार-पाच दिवसातच नम्रताचा मृत्यूू झाला. यानंतर आठवडाभरातच जवळगावात एका मागे एक बालके आजारी पडण्यास सुरूवात झाली. गावाजवळच पोल्ट्री फार्म असल्यामुळे नम्रताच्या मृत्युला पोल्ट्री फार्ममधील दूषित वातावरण तर कारणीभूत नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे. जवळगावात डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतमार्फत गावात फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एक दिवस उपसरपंचांनी स्वखर्चाने गावात फवारणी केली. गावात बालके आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना ग्रामसचिव मात्र गावात फिरकलेसुध्दा नाही. तब्बल तीन दिवस फॉगींग मशीन बंद ठेवण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी गावाला भेट दिल्यानंतर फॉगिंग मशीन ने फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे याही दिवशी सचिव गावात हजर नव्हते. यामुळे सचिवाविषयीसुध्दा ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.