सिंचन शोधयात्रेने मांडले वास्तव : पेंटिंग आणि पथनाट्यातून राज्यभरात करणार जनजागृतीयवतमाळ : धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमीन हस्तगत करायची अन् त्यावर धरण बांधायचे. प्रत्यक्षात धरणाच्या निर्मितीनंतर प्रकल्पातील पाणी परस्पर उद्योगांकडे वळते करायचे. असाच छुपा अजेंडा राज्यशासनाचा आहे. यातून शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतीच श्रीमंत झाले. सरकार बदलले तरी प्रकल्पांबाबतचे धोरण तसेच आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जनमंचच्या वतीने सिंचन शोधयात्रेचे आयोजन करण्यात आले. गत चार महिन्यांपासून सुरू असलेली ही शोधयात्रा यवतमाळात दाखल झाली आहे.शनिवारी यवतमाळच्या पाचकंदिल चौकात जनमंचच्या सिंचन शोधयात्रेने विशेष पेंटिंग साकारली. त्यातून सिंचनाचा प्रश्न सर्वांपुढे मांडला. ही छायाचित्रे पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी जनमंचच्या वतीने प्रकल्पांच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले. प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला आहे. यातून प्रकल्पाच्या कॅनॉलसह प्रकल्पाला हादरा बसला आहे. यामुळे आजही प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट प्राप्त करता आलेच नाही. आजही धरणातून पूर्ण क्षमतेने ओलित होत नाही.जलप्रकल्पाचे वास्तव शोधण्यासाठी जनमंचच्या कार्यकर्त्यांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. चार महिन्यांपासून जनमंचने हा उपक्रम हाती घेतला आहे. दर १५ दिवसांनी एका प्रकल्पाला भेट दिली जाते. त्या ठिकाणची माहिती छायाचित्ररूपात गोळा करण्यात येते. आतापर्यंत अशा सात प्रकल्पांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तुरागोंदी, लोअर वर्धा, वठाजी पिंपळगाव, कार, सतरापूर, अंभोरा आणि गोसेखुर्द प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा जनमंचच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. या प्रकल्पावर हजारो कोटी रुपये खर्च झाले. हे काम निकृष्ट आहे. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. ही संपूर्ण माहिती विदर्भ सिंचन मंडळाकडे सादर करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या निकृष्ट कामाचे प्रदर्शन मुंबईला लावण्यात आले होते. लवकरच विदर्भातील विविध शहरांमध्येही हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. जनमानसात प्रकल्पाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. जनमंचचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूरच्या चित्रकारांचा अलग अँगल ग्रुप, वर्धेचा पथनाट्य ग्रुप एकत्र आला आहे. यावेळी जनमंचचे अध्यक्ष सुरेश शिंदे पाटील, मिली विकमसी, भारती तिवारी, पलक अग्रवाल, पलाश शंकर, प्रवीण चांदेवार, रिद्धी विकमसी, मुकंद बावणे, श्रीकांत परबत, विवेक कवठेकर, राजेश चव्हाण, रवी काळे, मोहन चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
जमीन शेतकऱ्यांची, पाणी उद्योगांना
By admin | Updated: August 23, 2015 02:37 IST