सदानंद लाहेवार - बिजोरा
सुमारे २५ वर्षापूर्वी डीएड झाला म्हणजे हमखास नोकरी असे समीकरण होते. ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डीएड होऊन शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डीएडला नंबर लागला की स्वर्ग दोन बोटे उरायचा. मात्र अलिकडच्या काळात अध्यापक महाविद्यालयांच्या सुळसुळाटामुळे डीएड झालेल्या तरुणांची मोठी फौजच निर्माण झाली. नोकरी मिळत नसल्याने आता भावी शिक्षक मिळेल ते काम करण्यात धन्यता मानतात. अनेक भावी शिक्षक तर काळीपिवळीवर चालक आहे तर काहींनी पानटपरी आणि किराणा दुकान थाटले आहे. २५ ते ३० वर्षापूर्वी डीएड शिक्षकांना मोठा मान होता. शिक्षक होऊन ग्रामीण भागात ज्ञानार्जनाचे काम ही मंडळी करीत होती. काही वर्षापूर्वी खासगी संस्थांना डीएडच्या विद्यालयाची खिरापत वाटली. ठिकठिकाणी विद्यालय थाटली गेली. पूर्वी ७० टक्क्याच्यावर डीएडला नंबर लागायचा. मात्र खासगी अध्यापक विद्यालयात कमी गुण असणार्यांनाही प्रवेश मिळू लागला. विद्यार्थी संख्या कमी आणि अध्यापक विद्यालय अधिक अशी स्थिती झाली. आता तर अध्यापक विद्यालयांना विद्यार्थीही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेकडो तरुण डीएड होऊन बाहेर पडले आहे. मात्र कुठेही नोकरी मिळत नाही. अलिकडे डीएड झालेल्या तरुणांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली. गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. नोकरी मिळत नसल्याने या तरुणांनी आता व्यवसाय स्वीकारले आहे. ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतात राबतात. कुणी दुग्ध व्यवसाय तर कुकुटपालन करीत आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, असे भावी शिक्षक आपल्या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहे. तर काही शिक्षकांनी चक्क आॅटोरिक्षा विकत घेतले आहे. काही काळीपिवळीवर चालक आहे तर काहींनी मोबाईल, पानटपरी, किराणा दुकान थाटले आहे. डीएड बेरोजगारांची ही अवस्था पाहून आता तरुणांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कधी काळी नोकरीची हमखास हमी असणारे डीएड आता बेरोजगारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहे. अनेक बेरोजगार त्रस्त दिसत आहे.