रॉय : समता पर्व २०१४ चे उद्घाटन ं
यवतमाळ : जाती व्यवस्थेला दैवी मान्यता असल्याचा समज जनमाणसात पसरवून विषमता जोपासली जात आहे. आपण अत्यंत घृणा वाटावी अशा विषमतेने पोखरलेल्या एका समाज व्यवस्थेत जीवन जगत आहो, असे प्रतिपादन जगविख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी केले. त्या समता पर्व २०१४ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. समता मैदानावर आयोजित समता पर्व २०१४ चे उद्घाटन अरुंधती रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. जाती व्यवस्थेच्या माध्यमातून विषमता कशी जोपासली जात आहे, यावर अरुंधती रॉय यांनी प्रकाश टाकला. देशातील ८०० मिलीयन लोकसंख्या केवळ २० रुपयापेक्षा कमी पैशात आपली गुजराण करीत आहे. याच वर्गाला कारखाने, प्रकल्प यासाठी वारंवार विस्थापित केले जात आहे. केवळ तीन टक्के असलेल्या वर्गाकडून ही व्यवस्था जोपासली जात आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी यांना आपसात भांडत ठेवले जात आहे. गुजरातच्या दंगलीत हिंदूच्या नावाखाली दलित व ओबीसींना आरोपी बनविण्यात आले. निवडणुकीच्या काळात अतिशय चुकीच्या पध्दतीने प्रचार केला जात आहे. आज माध्यम आणि अर्थव्यवस्था भांडवलदाराच्या हातात एकवटली आहे. त्याच पध्दतीने राजकीय पुढारीसुध्दा सोयीची भूमिका घेत आहे. पूर्वी आदिवासींच्या हक्कासाठी सुरू असलेल्या चळवळींना आता बदनाम करण्यात आले आहे. देशातील बहुतांश राज्यात सैनिक तैनात करावे लागत आहे. दलितांवरच्या अन्यायाबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा संदर्भ देत त्याची भीषणता त्यांनी विशद केली. गुजरातच्या विकासाची बोंब केली जात आहे. तेथेच सर्वाधिक जातीयवाद आणि विषमता असल्याचे रॉय यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी विद्वेषांच्या विभाजनवादी परियोजनांना मोडीत काढण्यासाठी आमच्या राजकारणाने योजना तयार केल्या पाहिजेत. हिंसक शक्तीला बळी पडून ज्यांची छळवणूक झाली, त्यांना मदत केली पाहीजे. न्यायाचे तत्व केंद्रस्थानी असेल, अशी राजकीय दृष्टी आम्ही विकसित केली पाहिजे, असे आवाहन करतांनाच हा न्याय मुठभर लोकांसाठी नसावा, अशी सूचनाही अरुंधती रॉय यांनी केली. त्यांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद प्रा. माधव सरकुंडे यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हर्षदीप कांबळे होते. यावेळी एस. आनंद, डॉ. मनिषा बांगर, डॉ. कांचा इलय्या यांनी मार्गदर्शन केले. मंचावर महाकवी सुधाकर गायधनी, सुनील सरदार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)