शशिकांत ठाकूर कासापावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत डोळ्यांसमोर उभी राहते हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी, पण आजच्या आधुनिक युगात ही बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलरच्या वापराला प्राधान्य देतांना दिसत आहेत.खेड्यापाड्यांतील शेतकरी म्हटले म्हणजे त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक-दोन जोड्या, ही असणारच, असा समज. एकदा जून महिना उजाडला की, जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे, किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरासाठी व चिखलणीस लागणाऱ्या फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे, अशा कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. नांगर मजबूत, टिकाऊ असावा, यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर यासारख्या वृक्षांच्या लाकडांचा वापर करतात.ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरू लागले आहेत. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा तसेच शारीरिक श्रमदेखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीतकमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करीत असत. परंतु, आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३०० रु. प्रतितास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत.
लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 22:11 IST