वर्धा : ग्रामीण भागात असलेली इंटरनेट सुविधा नेहमीच खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. येथील नागरिकांना एका प्रमाणपत्राकरिता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. यात त्याची मजुरी जात असून प्रवासाच्या खर्चाचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट पंचायत समितीत ७६ च्या जवळपास ग्रामपंचायत कार्यालये आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणकासह आॅनलाईन सेवा पुरविण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. सर्व प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षाने आॅनलाईन सेवेचे तिनतेरा वाजले आहे. यामुळे प्रमाणपत्रासाठी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावे लागतात. यासाठी नागरिकांना खर्च येत असल्याने संगणकीय प्रमाणपत्र ग्रामीण भागासाठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. वेणी येथील मेश्राम यांच्या मुलाला वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी सरपंचाचे प्रमाणपत्र पाहिजे होते; परंतु येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, टोनर, रिम, पेपर आदी साहित्यासह इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने त्याला अडचणीचा सामना करावा लागला. केवळ ग्रामस्थांनाच नाही तर येथील उपसरपंच कैलास तेलंगे, धनराज ठाकरे, नरेश गंगापारी यांनाही विविध प्रमाणपत्रे पाहिजे होती. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावी लागली.काही ठिकाणी भेटी दिल्या असता ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक आॅपरेटरच्या घरी वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी जावे लागत आहे. काही ग्रामपंचायतच्या संगणकचालकांनी झेरॉक्सची दुकाने थाटली आहेत. शासन आम्हाला पगार देत नसल्यामुळे झेरॉक्सच्या माध्यमातून घर खर्च चालवत असल्याचे बोलण्यास येथील कर्मचारी मागे येत नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हेच एक कारण आहे. हा सर्व प्रकार हिंगणघाट पंचायत समितीमधील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये सुरू असताना आॅनलाईनसेवा कमी आॅफलाइन सेवा सुरू आहे. याकडे गटविकास अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष असून ते या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा कुचकामी
By admin | Updated: October 25, 2014 01:42 IST