एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा : आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:14 IST2026-01-18T06:14:46+5:302026-01-18T06:14:46+5:30
निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले.

एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा : आव्हाड
ठाणे : राज्यात एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा. सगळीकडे वातावरण खराब करण्याचे काम भाजपच करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार)चे आ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला.
ठाणे पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) च्या निवडून आलेल्या नगरसेवकांची आ. आव्हाड यांनी ठाण्यातील पक्ष कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. निवडणुकीपूर्वीच आमचे उमेदवार सुधीर भगत यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार घडला होता. ज्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नसते, पण आज तेच सुधीर भगत निवडून आले आहेत.
निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले. काहींचे मताधिक्य कमी झाले, अन्यथा आमच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही अधिक असती, असा दावा त्यांनी केला.
ठाणे पालिकेत वेगळा विचार करण्याची भाषा भाजप करत आहे. मग मागील दहा दिवस त्यांच्याबरोबर एकत्र का होतात, असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.भाजपची ही भाषा म्हणजे ठाण्यातील मतदारांना त्यांनी फसवल्यासारखे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.