मालवण : बाबासाहेबांनी दलित व उपेक्षित समाजासाठी केलेल्या कार्यामुळे दलित व उपेक्षित समाज जगात ताठ मानेने समाजात वावरत आहे. बाबासाहेबांनी ३० दशके दलितांचे कैवारी म्हणून कार्य केले. दलित समाजाबरोबरच आंबेडकरांनी या देशासाठी भरभरून दिले. त्यांच्या क्रांतिकारी विचारात भारत महासत्ता बनण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी येथे केले.मालवण तालुका भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ वा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर, गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी विचारमंचावर स्वागताध्यक्ष विश्वनाथ कदम, सभाध्यक्ष संजय कदम, आनंद कासले, विजय कदम, भिकाजी वर्देकर, वि. रा. धामापूरकर, विलास वळंजू, आनंद तांबे, व्ही. टी. जंगम, बाळा चौकेकर, प्रमोद कासले, पी. के. चौकेकर, अनिल कदम, श्यामसुंदर वराडकर, किशोर राठिवडेकर, संजय पेंडूरकर, शंकर तळगावकर, त्रिशला कदम, सूर्यकांत कदम उपस्थित होते. यावेळी बौद्ध महासभा मालवण तालुकाध्यक्ष विश्वनाथ कदम यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भ. स. कदम स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वि. रा. तांबे यांना देऊन आंबेडकरयांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चर्मकार समाजातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या जाधव कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले. सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केले. आदर्श गायन क्लासचे संदीप पेंडूरकर यांनी बहारदार संगीत मैफल सादर केली.यावेळी आंबेडकर म्हणाले, बाबासाहेब हे भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. बाबासाहेबांनी केवळ दलित समाजासाठीच कार्य केले, असा अपप्रचार हितसंबंधी लोक व नेत्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात आला. मात्र १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्व राष्ट्रांनी बाबासाहेबांचे नेतृत्व, त्यांचे विचार उचलून धरले. देशातील सर्व समाजाने त्यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विचारधारा स्वीकारली आहे. बाबासाहेबांची धार्मिक विचारधारा, बुद्ध तत्वज्ञान अनेक समाज घटकातील युवापिढी स्वीकारू लागली आहे. बाबासाहेबांचे समता, बंधुत्व व न्याय हे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा १९३० च्या दशकात अठरापगड जातीतील समाजाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जायचे. त्यावेळी महार समाजातील वीर टिपूजी पडवेकर या युवकाने वराडकर याच्यावर हल्ला करत ठार केले. त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्याही भावाला कुणकवळे येथे ठार करून सावकाराच्या जुलुमातून मुक्त करण्यात आले. कुणकवळे खूनप्रकरणी लक्ष घालण्यासाठी डॉ. आंबेडकर हे कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी संस्थापक कै. डॉ. काकासाहेब वराडकर यांनी आंबेडकर यांचे आदरातिथ्य प्रशालेच्याच वास्तूत केले होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कट्टा हायस्कूलमध्ये तब्बल आठ दशकांनी बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर आल्याने बाबासाहेबांच्या आठवणीना यावेळी उजाळा मिळाला.
बाबासाहेबांच्या विचारात भारत महासत्ता बनण्याची ताकद
By admin | Updated: May 23, 2016 00:14 IST