सातारा : भगवान महावीरांसारखे निर्भय कोणी नव्हते. भगवानांची समता कधीही ढळली नाही. जैन धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे, असे लोकमान्य टिळकांनी सांगितले आहे. आजची प्रत्येक घरातील माता ही गीतेतील आदर्श आहे. लोकांना काहीतरी देण्यातच खरा आनंद आहे, असे उद्गार ज्येष्ठ भविष्यतज्ज्ञ आणि वराह मिहीर ज्योतिष विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य रमणलाल शहा यांनी काढले. पाचगणी येथे झालेल्या दोन दिवसीय महाश्वेता जैन संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात अध्यक्षस्थावरुन ते बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटक पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक मोहनलाल पालेशा होते. तसेच यावेळी संघटनेचे प्रदीप पारेख, धरमचंद शहा, उद्योजक भरतशेठ मेहता, सुभाष शहा, ललीत गांधी, जवाहरभाई शहा, तेजपाल शहा यांची उपस्थिती होतीप्रारंभी भरतशेठ मेहता यांनी भगवान महावीरांचे प्र्रतिमा पूजन केले. त्यानंतर नवकार मंत्रपठण व ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. रमणलाल शहा म्हणाले की, आपण मंदिरात का जातो? मंदिरात जाणे म्हणजे मनाला स्वच्छ करणे. भक्ती ही मनाची उत्कटता आहे. तर सुख हे आपल्या समाधानात आहे. मोहनलाल पालेशा म्हणाले की, आजच्या काळात उपलब्ध संधीचा योग्य उपयोग युवकांनी केला पाहीजे. आज एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होत आहे. मात्र खरी गरज ही एकत्र येण्याचीच आहे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे संवेदना कमी होत आहेत. (प्रतिनिधी)
प्रत्येक घरातील माता गीतेतील आदर्श
By admin | Updated: September 22, 2014 00:47 IST