कऱ्हाड : ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असं म्हणतात. पण, काहीही आणि कितीही जळालं तरी अग्निशामक पथकाला कर्तव्य पूर्ण होताच नाईलाजास्तव का होईना व्यवहारी भाषा बोलावी लागते. आग विझविण्याचा ‘चार्ज’ त्यांना जळीग्रस्ताकडूनच घ्यावा लागतो; पण हे पैसे घेताना पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी जळीतग्रस्ताच्या रोषाचा सामना करावा लागतो. तर कधी पैसे मिळविण्यासाठी ‘कागदी घोडी’ही नाचवावी लागतात. त्यातूनच या पथकावर आगपाखडही होते, हे दुर्दैव. आगीच्या ज्वाळा पाहिल्या की अंगाचा थरकाप उडतो; पण ज्वाळांनी लपेटलेल्या ठिकाणी जाऊन आणि जीव धोक्यात घालून अग्निशामक पथकाला आग विझविण्याचा प्रयत्न करावा लागतो. आग विझविणे, हेच या पथकाचे कर्तव्य आहे. मात्र, सध्या या पथकावरच आगपाखड केली जात असल्याचे दिसून येते. आग विझविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या पैशास्तव या पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अत्यावश्यक सेवा म्हणून समजल्या जाणाऱ्या अग्निशामक पथकाला उत्पन्न वाढीबाबत काही आदेश देण्यात आल्ो आहेत. मात्र, तरीही माणुसकी जपण्याच्या दृष्टिकोनातून या पथकाने जाचक आकारणी करून पैसे वसुली केलेली नाही. या पथकाला स्थायी निर्देश क्र. ३१ नुसार पैसे आकारणीसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्देशानुसार पालिका क्षेत्राबाहेर आग विझविण्यासाठी गेल्यास प्रथम तीन तासांला ४ हजार तर तेथून पुढे प्रत्येक तासाला १ हजार रुपयाप्रमाणे आकारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, तरीही येथील पालिकेच्या अग्निशामक पथकाकडून पालिका ठरावानुसारच पैशाची आकारणी केली जात आहे. २४ फेब्रुवारी २००९ रोजी पालिकेमध्ये केलेल्या ठरावानुसार पाण्याचे ५०० रुपये व प्रतिकिलोमीटर २० रुपयांप्रमाणे दर निश्चित केला आहे. १ एप्रिल २००९ पासून हा दर अंमलात आणण्यात आला आहे. आजही याच दराने पैशाची आकारणी होते. शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणी आग लागल्यास त्याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे पालिकेच्या अग्निशामक पथकाला देण्यात येते. अग्निशामक पथकाकडून या माहितीची खातरजमा करण्यात येते. त्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन हे पथक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करते. आग पूर्णपणे विझविल्यानंतर जळीतग्रस्ताकडे पैशाबाबत विचारणा करण्यात येते. मात्र, पैसे त्वरित देण्याबाबत त्याच्यावर जबरदस्ती केली जात नाही. घटनेनंतर काही दिवसांनी अग्निशामक पथक कार्यालयात संबंधित रक्कम जमा करण्याबाबत संबंधिताला सूचना देण्यात येते. मात्र, हे पैसे देतानाही काहीवेळा अग्निशामक पथकावरच संबंधितांकडून राग काढण्यात येतो.आग लागल्याची माहिती मिळताच पथकप्रमुख विक्रम जाधव यांच्यासह हे पथक संबंधित ठिकाणी रवाना होते. आग विझविण्यासाठी या पथकाकडून अथक प्रयत्न केले जातात. मात्र, अपवादात्मक ठिकाणी आग आटोक्यात येत नसल्याचे निदर्शनास येताच हे पथक इतर ठिकाणच्या अग्निशामक पथकाला त्याठिकाणी पाचारण करते. त्या पथकाच्या मदतीने आग विझविण्यात येते. तसेच पाचारण करण्यात आलेल्या त्या दुसऱ्या पथकाला पालिकेकडून पैसे देण्यात येतात. जळीतग्रस्ताला त्या दुसऱ्या पथकाला पैसे द्यावे लागत नाहीत. (प्रतिनिधी)पथकात सहाजणांचा समावेशअग्निशामक पथकामध्ये पथकप्रमुख, लिडिंग फायरमन व फायरमन अशी पदे असतात. एका गाडीबरोबर १ लिडिंग फायरमन, ४ फायरमन व चालक असे सहाजणांचे पथक असते. कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक पथकात सध्या १२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये २ फायरमन, ६ चालक व इतर ५ जणांचा समावेश आहे. विक्रम जाधव हे या पथकाचे प्रमुख आहेत.दहा महिन्यांत ६९ घटनाजानेवारी २०१५ पासून आजअखेरपर्यंत कऱ्हाड शहर, तालुक्यासह आसपासच्या ६९ ठिकाणी पालिकेच्या अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले होते. संबंधित ठिकाणी जाऊन पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. नुकत्याच झालेल्या लक्ष्मीपूजन (दिवाळी) सणादिवशी या पथकाला एका दिवसात सहा ठिकाणी आग विझविण्यासाठी जावे लागले होते. कऱ्हाड तालुक्यात तीन ठिकाणी पथकेकऱ्हाड तालुक्यात पालिका, कृष्णा चॅरिटेबल तसेच कृष्णा कारखाना या तीन ठिकाणी अग्निशामक पथके आहेत. कऱ्हाड पालिकेच्या पथकाकडे तीन, कृष्णा रुग्णालयाकडे दोन व कृष्णा कारखान्याकडे एक गाडी उपलब्ध आहे.
म्हणे, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं !
By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST