संजय पाटील - कऱ्हाड -अठरा वर्षांपर्यंतच वय निरागस मानलं जातं. या काळात संबंधित मुलाकडून एखादी चूक झालीच, तर त्याला पालकांकडून तत्काळ माफही केलं जातं; पण एखाद्या बालकाची चूक कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा ठरते. संबंधित बालकाला कायद्याच्या भाषेत ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणून ओळखलं जातं. कऱ्हाड शहर पोलिसांच्या दप्तरी २००६ पासून तीनशेहून अधिक बालके गुन्ह्यात अडकल्याची नोंद आहे. या नोंदीतून अल्पवयीन मुलांभोवती पडत असलेला गुन्हेगारीचा विळखा अधोरेखित होतोय. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग सध्या चिंतेचा विषय बनलाय. अनेक मुले हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तर काहीजण फक्त मौजमजेसाठी गुन्हा करीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. कऱ्हाड शहरात गत काही वर्षांमध्ये घडलेल्या खून, मारामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी, मोनोग्राम चोरी, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अनेक अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या मुलांमध्ये गरीब, अनाथ मुले आहेतच; पण सुखवस्तू कुटुंबातीलही मुले पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतल्याची उदाहरणे आहेत. काही मुलांचा गुन्हेगारी मार्गावरील प्रवासही थक्क करणारा आहे. व्यावसायिक, नोकरदार, प्रतिष्ठित कुटुंबातील मुलेही चैनीखातर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. काही मुले वाईट संगतीमुळे या मार्गाला लागल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच काही अट्टल गुन्हेगारांकडूनही गुन्हे करण्यासाठी बालकांचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अट्टल गुन्हेगारांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्यांच्याकडून गुन्हे करण्यासाठी जाणीवपूर्वक बालकांचा वापर करून घेतला जातो. त्यासाठी ते बालकांना कधी पैशाचे तर कधी पाठिंब्याचे आमिष दाखवतात.या प्रलोभनाला बळी पडलेली मुले गुन्हा करून कायद्याच्या कचाट्यात अडकतात; पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अशा मुलांना कायद्यातील पळवाटा शोधून बाहेर काढणे सोपे असते, हे अट्टल गुन्हेगारांना माहीत आहे. त्यामुळे ते सर्रास अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये उपयोग करून घेतात. अशातूनच संबंधित अल्पवयीन मुले निर्ढावतात आणि पुढे गुन्हेगारी क्षेत्राशी जोडली जाऊन आयुष्यातून उठतात, असे समोर आले आहे.आमिष, स्पर्धात्मक वातावरण आणि समाजातील भूलभुलैय्या बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरतोय. तसेच आपल्या अज्ञानाला बालके स्वत:च बळी पडत आहेत. विधिसंघर्षग्रस्त बालकांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बालकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक बालके कोणाच्या तरी दबावाला, आमिषाला बळी पडून गुन्ह्यात अडकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाळा, कॉलेज व नातेवाइकांनी बालकांकडे लक्ष द्यायला हवे. तसेच बालगुन्हेगारी रोखण्यात समाजाची भूमिकाही महत्त्वाची आहे. - बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक२००६ नंतरच्या गुन्ह्यातील विधिसंघर्षग्रस्तखून ३, खुनाचा प्रयत्न ५, दरोडा ९, जबरी चोरी ३, दिवसा घरफोडी १८, रात्री घरफोडी १२, सर्व प्रकारच्या चोऱ्या १४५, गर्दी मारामारी ३१, दुखापत १३, शासकीय नोकर हल्ला ३, बलात्कार २, विनयभंग ३, शरीराविरूद्धचे गुन्हे ४०, मालमत्तेविरूद्धचे गुन्हे १५५.लहान वयात होणारे संस्कार मनावर खोलवर रूजतात. त्यामुळे बालवयातच चांगल्या प्रकारचे संस्कार घडविणे गरजेचे असते. शिक्षक विद्यार्थ्याला आदर्शवत बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, मूल कायम पालकांच्या सहवासात अधिक काळ असते. त्यामुळे त्यांनी जबाबदारी जाणून घ्यायला हवी. बालकात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला तर बालगुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. - नकुशी देवकर, शिक्षिकाकायदा काय सांगतो..?१ अठरा वर्षांखालील बालक एखाद्या गुन्ह्यात अडकल्यास त्याला ‘आरोपी’ संबोधण्यास कायद्याने मनाई आहे. संबंधित बालकाला ‘विधिसंघर्षग्रस्त’ अशी संज्ञा तयार करण्यात आली आहे. २ बालकांचा सहभाग असलेले खटले बाल न्यायालयात चालविले जातात. ३ विधिसंघर्षग्रस्त बालकास बेड्या घालण्यासही मनाई आहे. पोलिसांनी अशा बालकासमोर जाताना साध्या वेशात जावे, असाही नियम आहे. ४ विधिसंषर्घग्रस्त बालकावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याला तुरूंगात पाठविले जात नाही, तर पालकांच्या निगराणीखाली त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते. ५ संबंधित बालकाला तत्काळ जामीन देण्याचा अधिकारही पोलिसांना आहे.
बालपण अडकतंय कायद्याच्या कचाट्यात!
By admin | Updated: September 18, 2014 23:26 IST