Sangli Election 2026: विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:56 IST2026-01-03T17:54:34+5:302026-01-03T17:56:52+5:30
मुख्यमंत्री व गृहमंत्री आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका' चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

Sangli Election 2026: विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
सांगली : गत निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपवर विश्वास दाखविला. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केले. यंदाच्या निवडणुकीतही भाजपच्या हाती सत्ता घ्या, पुढील पाच वर्षे मी तुमची चिंता करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. सांगलीत केवळ भाजपने सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले, विरोधकांना ५० उमेदवारही सापडले नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेने झाला. यावेळी ते बोलत होते. सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, आमदार अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, सांगली महापालिकेची सत्ता अनेक वर्षे एकाच पक्षाकडे होती. गतवेळी आम्ही विकासाचे आश्वासन दिले. जनतेनेही आशिर्वाद दिल्याने महापालिकेची सुत्रे भाजपच्या हाती आली. सत्ताकाळात दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सांगली-कोल्हापूरची महापुरातून सुटका करण्यासाठी जागतिक बँकेशी चर्चा करून ४५०० कोटीचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ५९१ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुराचे वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळविण्याचा प्रयत्न आहे.
वाचा : राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यातून विकासाचे मुद्दे हरवले, समस्या 'जैसे थे'
सांगलीच्या पाण्याचा प्रश्नही लवलकरच सोडविणार आहोत. त्यासाठी ४५४ कोटीची वारणा उद्धभव योजना मंजुरीसाठी येत आहे. त्यालाही तातडीने मंजुरी दिली जाईल. तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामांमध्ये पैशाची कमतरता राहणार नाही.
सांगलीतील मुले सातत्याने पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जातात. आम्हाला आयटी इंडस्ट्रीज सांगलीमध्ये कशी आणता येईल याचाही प्रयत्न येत्या काळामध्ये करायचा आहे.
वाचा : बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश, काँग्रेसला धक्का
इतके वर्ष कवलापूरला विमानतळाचा थांगपत्ता नाही. कवलापूर विमानतळाबाबत अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. त्याचा अहवालही लवकरच येईल. सांगलीत एकमेव युतीने 78 उमेदवार उभे केले आहे. बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत. मतदानाच्या दिवशी महायुतीची चिंता तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आमच्यावर सोडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी नितीन शिंदे, दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे नेते समित कदम, डॉ. रवींद्र आरळी, पृथ्वीराज पवार, पृथ्वीराज पाटील, सुशांत खाडे, सुरेश आवटी, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे, नीता केळकर, जयश्री पाटील, भारती दिगडे, स्वाती खाडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दमात, हलक्यात घेऊ नका : चंद्रकांत पाटील
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वक्तव्याचा सभेत समाचार घेतला. ते म्हणाले, युतीतील पक्षाने एकमेकावर टीका करायची नाही, असे ठरले होते. पण त्याची सुरुवात झाली आहे. किती चालणार, कुठे जाणार हे अंदाज घेऊन ठरवू. नगरपालिका निवडणुकीत तिजोरीच्या किल्ल्यावर मालक आमच्याकडे आहे असे म्हटले. आता 'घरला जायचे आहे का?' असे ते म्हणाले, पण मी म्हणतो ' मुख्यमंत्री व गृहमंत्री आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका' असा इशारा त्यांनी दिला.