सर्दी झाली की आपण औषधांवर भर देतो, विविध उपाय करतो. तरी सर्दी बरी होत नाही. कारण आहाराकडे लक्ष देणं राहून जातं. रोजच्या आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं, जेवढं वेळेवर औषधं घेणं. काही पदार्थ सामान्यतः आरोग्यासाठी चांगले असतात, पण सर्दी असताना ते त्रास वाढवू शकतात. (Do you have a cold and runny nose? These 5 foods increase colds, health care tips )त्यामुळे अशा वेळी काय खावं याइतकंच काय टाळावं हे ही समजून घेणं गरजेचं आहे. नेहमी काही पदार्थ जरुर खावेत मात्र सर्दी झाल्यावर काही दिवसांसाठी आहारात असू नयेत.
दुग्धजन्य पदार्थ हे शरीरासाठी पौष्टिक असले तरी सर्दीच्या वेळी काही लोकांमध्ये कफ वाढवण्याचं काम करतात. थंड दूध, आइस्क्रीम किंवा जास्त चीज खलल्यास घसा जड होणे, कफ साचणे असा त्रास वाढू शकतो. त्यामुळे सर्दी असताना हे पदार्थ थोड्या प्रमाणात किंवा गरम करूनच घ्यावेत. नुसते दूध पिणे , हळद घालून प्यायले तर उत्तम. पण त्याचे आटवून वगैरे केलेले पदार्थ टाळा.
दही हे पचनासाठी चांगलं असलं असतं. दही आहारात असायलाच हवं. मात्र त्यातील थंड गुणधर्मामुळे सर्दीच्या वेळी टाळणं योग्य ठरतं. विशेषतः रात्री दही खाल्ल्यास कफ वाढू शकतो आणि घशात खवखव जाणवू शकते. त्यामुळे दही काही दिवस खाऊ नका.
केळी हे फळ ऊर्जादायी आणि पोषक असतं, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही गरजेचं असतं. मात्र केळी खाल्याने सर्दी वाढते. विशेषतः सकाळी किंवा रात्री केळी खाल्ल्यास नाक बंद होणे किंवा सर्दीचे प्रमाण वाढणे असे त्रास होतात. थंड पेय आणि फ्रीजमधील पदार्थ सर्दीच्या वेळी पूर्णपणे टाळलेलेच बरे. कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी यामुळे घशावर परिणाम होतो आणि सर्दी-खोकला वाढू शकतो.
तळलेले आणि पॅकेज्ड पदार्थ पचायला वेळ घेतात, त्यामुळे शरीराची ऊर्जा पचनाकडे वळते आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. भजी, वडे, फास्ट फूड यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते. साखर आणि जास्त गोड पदार्थही सर्दीच्या वेळी कमी खाणे गरजेचे आहे. जास्त साखर घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि सर्दी लवकर बरी होण्यास अडथळा येऊ शकतो. एकंदरीत, हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी वाईट नाहीत, पण सर्दी असताना त्यांचा परिणाम वेगळा होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी गरम, हलकं आणि पचायला सोपं अन्न घेणं अधिक फायदेशीर ठरतं. आहाराची काळजी घेतली तर सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते.
