कुकरमध्ये भात शिजवताना चिकट होतो- पाणी राहते? वाटीभर भातासाठी पाण्याचे अचूक प्रमाण -५ टिप्स, भात होईल मऊ-मोकळा
Updated:May 6, 2026 20:00 IST2026-05-06T20:00:00+5:302026-05-06T20:00:02+5:30
Cooker Whistle Count for Rice: Basmati Rice Cooker Method: आपल्यालाही मोकळा, सुटसुटीत आणि मऊ भात हवा असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा.

कुकरमध्ये भात शिजवणं ही गोष्ट रोजची असली तरी अनेकदा भात एकतर तळाला लागतो किंवा त्याचा लगदा होतो. भाताचा प्रत्येक दाणा सुटा, पांढराशुभ्र आणि मऊ असला की दोन-चार घास जास्तीचे आपल्याला जातात पण घाईघाईत कुकर लावताना पाण्याचे प्रमाण थोडेही चुकले, तर तांदूळ चिकट होतात किंवा त्यात पाणी राहून भात पचपचीत होतो. नवीन तांदूळ असल्यास ही समस्या जास्त जाणवते. गृहिणींना अनेकदा वाटीभर तांदळाला पाणी किती घालावे? किंवा किती शिट्ट्या कराव्यात? यात संभ्रम असतो. (Cooker Whistle Count for Rice)
कुकरमध्ये भात शिजवताना फक्त पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे नसते, तर तांदूळ धुण्याची पद्धत आणि वाफ काढण्याची वेळही तितकीच महत्त्वाची असते. आपल्यालाही मोकळा, सुटसुटीत आणि मऊ भात हवा असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा. (Basmati Rice Cooker Method)
खरंतर तांदळाच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण ठरते. १ वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी २ वाटी पाण्याचे प्रमाण असते. जर तांदूळ थोडा जुना असेल तर थोडे जास्त पाणी घाला. तांदूळ नवीन असल्यास दीड ते दोन वाट्या पाणी घालायला हवं.
तांदूळ शिजवण्यापूर्वी २ ते ३ वेळा हलक्या हाताने धुवावेत. ज्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. स्टार्च कमी झाला की भात चिकट होत नाही. शक्य असल्यास तांदूळ १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे भात छान फुलतो.
तांदूळ कुकरमध्ये घालताना त्यात पाच ते सहा थेंब लिंबाचा रस आणि अर्धा चमचा तूप किंवा तेल घाला. लिंबामुळे भात पांढराशुभ्र होतो आणि तुपामुळे भात सुटसुटीत होतो.
कुकरमध्ये भात लावल्यानंतर मध्यम आचेवर ३ शिट्ट्या करा. जर तांदूळ आधी भिजवले असतील तर २ शिट्ट्याही पुरेशा असतात.
शिट्ट्या झाल्यानंतर गॅस लगेच उघडण्याची चूक करु नका. गॅस बंद केल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी कुकर थंड झाल्यावर तो उघडा. वाफेमुळे तांदूळ पूर्णपणे शिजतो आणि भात मोकळा होण्यास मदत होतो.