बारामती : भारतातील लोकशाही बळकट करताना युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवायला हवा. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्य करून महत्वाचे योगदान द्यायला हवे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय, बारामती येथे सोमवारी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहा. तहसीलदार विजय पाटील, निवडणूक नायब तहसीलदार पी. डी. शिंदे, नायब तहसिलदार संजय गांधी योजना भोसले, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
भारतीय लोकशाही बळकट व सक्षम होण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार नोंदणीतून आणि मतदानामध्ये सक्रीय सहभागातून होत असल्याने युवकांनी यात पुढाकार घ्यावा, त्याकरीता वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्रताधारक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक विभागामार्फत प्रचार, प्रसार व मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे, असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
निवडणूक आायोगाचा २५ जानेवारी हा स्थापना दिवस आहे. हा दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारामंध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी या उद्देशाने या दिवशी वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून कोणी वंचित राहू नये, असेही ते यावेळी म्हणाले. आज पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये नवमतदार विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.