कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:20 PM2024-05-17T15:20:06+5:302024-05-17T15:20:15+5:30

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपला डावलण्याचा मूड मतदार कायम ठेवतील की बदलतील? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून कळणार

The real match in the village is between Congress and BJP Displeasure is displeasure, like is like | कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

राजू इनामदार 

पुणे : पुणे शहर म्हटले की पहिली आठवते ती कसबा पेठ! फक्त कसबाच नाही तर या विधानसभा मतदारसंघात सगळ्या पेठाच आहेत. त्यात ऐतिहासिक प्रसिद्ध वाडे, गल्ल्या, बोळ, चौक आले. त्याशिवाय काही वस्त्या, वसाहती आणि अलीकडे मोठ्या बहुमजली सोसायट्याही येथे झाल्या आहेत.
हे नव्हते तेव्हा आणि आताही अगदी काल-परवापर्यंत कसबा विधानसभा हा उजव्यांचा, म्हणजे पूर्वी जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष यांचा हक्काचा विधानसभा मतदारसंघ! काँग्रेसचा पुण्यात सगळीकडे सुवर्णकाळ होता, पण तो कसबा विधानसभा मतदारसंघ वगळून! इथे विधानसभेला निवडून येणार तो जनसंघाचा उमेदवार. अपवाद म्हणून एकदोन वेळा समाजवादी, प्रजासमाजवादी या पक्षांना यश मिळाले, पण ते अपवाद म्हणूनच! आणखी एक अपवाद म्हणजे दोन वेळा झालेल्या पोटनिवडणुका. दोन्ही वेळा काँग्रेसने हा मतदारसंघ मिळवला. १९८० मध्ये उल्हास काळोखे यांनी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले. हे दोघेही नगरसेवक होते, तेही शिवसेनेचे. (धंगेकर मात्र शिवसेनेतून मनसेत व मनसेतून काँग्रेसमध्ये आले).

मतदारांचा मूड

कसब्यातील मतदार अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीतील भाजपला डावलण्याचा मूड कायम ठेवतील की बदलतील? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून कळेलच, पण निरीक्षण म्हणून तो मूड आज तरी कायम दिसतो आहे. कारण लोकसभेला इथल्या मतदारांनी चांगले, म्हणजे २,७६,९९७ पैकी १,६०,३८१ जणांंनी मतदान केले आहे. हे मतदान ५७.९ टक्के आहे. कंटाळलेले असते तर इतक्या मोठ्या संख्येने मतदार बाहेर आले असते का? सहसा असे होत नाही. पोटनिवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी मतदार आले असे भाजपचे कार्यकर्ते म्हणू शकतात, तसेच कसबा आपलीच मक्तेदारी असे समजणाऱ्यांना आणखी एक मोठा धडा शिकवण्यासाठी ते आले, असा दावा काँग्रेस समर्थक करू शकतात! पण मतदारांचा मूड काय हे निकालातूनच कळणार आहे.

काँग्रेस-भाजपच लढणार 

विधानसभेचा सामनादेखील काँग्रेस व भाजप याच दोन राजकीय पक्षात होणार हे नक्की आहे. त्यांचे मित्रपक्ष आता आहे तेच असतील की बदलतील? हा झाला राजकारणाचा भाग. पण महायुतीत ही जागा भाजपची आहे. शिवसेना एक होती, त्यावेळी त्यांनी कसब्यावर दावा केला होता, शिवसेनेतून बंडखोरी करत नगरसेवक विशाल धनवडे यांनी निवडणुकही लढवली होती, (आणि १५ हजार मतेही घेतली होती) पण आता शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) कोणीही इथे दावा करणार नाही आणि भाजपला झटका द्यायचा म्हणून शिवसेना (उबाठा) चे ही कोणी इथे आता हक्क दाखवणार नाही.

उमेदवार कोण असेल?

विधानसभेला उमेदवार कोण असतील हा मात्र प्रश्न आहे. धंगेकर खासदार नाहीच झाले तर तेच असतील हे नक्की, पण विजयी झाले तर ते नसतील. पण विजयाची हमी असल्याने काँग्रेसकडून मग उमेदवारीसाठी रांगच लागेल. त्यात पहिले असतील शहराध्यक्ष अरविंद शिंदे. पण त्यांनी इथून एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती, व त्यांना फार लक्षणीय मते मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना लक्षणीय विरोध होणार. त्यामुळे बाळासाहेब दाभेकर यांच्यापासून ते बाळासाहेब अमराळे यांच्यापर्यंत, व्हाया संजय बालगुडे, कमल व्यवहारे असे अनेकजण उमेदवारीवर दावा करतील. काँग्रेस बुडती नौका समजणाऱ्यांसाठी या मतदारसंघात अशी वेगळी परिस्थिती असेल.

भाजपतही अशीच स्थिती

दुसरीकडे भाजपमध्येही हीच स्थिती असेल. पोटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने परत उमेदवारी करण्यासाठी अर्थातच आग्रही असतील. पण तो पराभव मतदारांना उमेदवार पसंत नसल्यानेच झाला याचा भाजवाल्यांनीच इतका प्रसार केला आहे की रासने यांना परत उमेदवार करताना पक्षाकडून १०० वेळा विचार होईल. मग माजी सभागृह नेते गणेश बीडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्यासह अनेक नावे चर्चेत येतील. पर्वती विधानसभा तीन वेळा जिंकणाऱ्या माधुरी मिसाळ यांना यंदा कसब्यातून उमेदवारी हवीय हेही आता लपून राहिलेले नाही. भाजपचे अलीकडच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे सतत बदल करत राहणे. मग ते उमेदवार बदलणे असो, नव्यांना संधी देणे असो किंवा पक्षाचे धोरण बदलणे असो. ते अगदी सहज हा बदल करतात व कार्यकर्ता स्तरावर तो स्वीकारलाही सहज जातो. असे करून ते मतदारांनाही हा बदल पचनी पडायला भाग पाडतात.

अन्य पक्षांची स्थिती

हे झाले प्रमुख पक्ष. याशिवाय दोन्ही आघाड्यांमधील काही पक्ष फुटले, तर त्यांचे स्वतंत्र उमेदवार असतीलच. वंचित तर आताच स्वतंत्र आहे. त्याशिवाय रिपाइंचे काही गट आहेत. आपसारखा अलीकडे राजकीय ताकद दखल घ्यावी इतकी वाढवलेला पक्षही इंडिया फ्रंटपासून बाजूला होऊन निवडणूक लढवू शकतो. एकूण काय, कसब्यासाठी विधानसभा निवडणूक फारच रंगतदार असणार आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून काहीजण दाखवत असलेला पुढाकार ही त्याचीच नांदी होती. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतील फुटीचा परिणाम इथे फारसा जाणवणार नाही,कारण कसब्यातून राजकीयदृष्ट्या उमेदवारी करण्याइतपत ते अजून विकसितच झालेले नाहीत.

Web Title: The real match in the village is between Congress and BJP Displeasure is displeasure, like is like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.