पुणे : शहरातील रस्ते वाहनांनी दुथडी भरून वाहत आहेत, वाहतूककोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या वाहतूककोंडीने वाहनचालक जेरीस आलेले असताना नादुरुस्त पीएमपीएमएल बसेस रस्त्यामध्येच बंद पडल्यामुळे वाहतुकीची अक्षरश: ‘वाट’ लागते आहे. जानेवारी महिन्यात रस्त्यामध्ये पीएमपी बस बंद पडल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच रस्ता बदलावा लागला होता. पीएमपी प्रशासनाला याबाबत वाहतूक पोलिसांनी पत्र दिल्यानंतर सुधारणेचे दिलेले आश्वासन मात्र केव्हाच हवेत विरले असून, गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३८० वेळा बस बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी झाल्याची आकडेवारी आहे.दोन दिवसांपूर्वी बाजीराव रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर बस बंद पडल्या, की या रस्त्यांवरची वाहतूक मंदावते. पीएमपी बसचा आकार आणि रस्त्यांची रुंदी यामुळे अन्य वाहनांना जायला जागाच शिल्लक राहत नाही. मध्यवर्ती पेठांमधील गर्दीच्या आणि बाजाराच्या रस्त्यांवरही बसेस बंद पडण्याचे प्रकार सतत सुरू असतात. यासोबतच पीएमपीचे चालक बसथांब्यांवर बसेस व्यवस्थित उभ्या करत नाहीत. रस्त्याच्या कडेला सरळ रेषेमध्ये बस उभ्या करण्याचे तर जणू प्रशिक्षणच या चालकांना देण्यात आले आहे, की नाही असा विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती आहे. महापालिकेसमोरच्या शिवाजी पुलाच्या दोन्ही बाजूला नेमकी हिच परिस्थिती पहायला मिळते. वेड्या वाकड्या आणि बेदरकारपणे उभ्या करण्यात आलेल्या पीएमपी बसमुळे वाहतूककोंडी तर होतेच, परंतु अनेकवेळा अपघातही होण्याची शक्यता असते. जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक सिग्नल बसल्याच्या घटनेला बुधवारी १०१ वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील ‘हाऊस आॅफ पार्लमेंट’ समोरच्या चौकात हा सिग्नल बसवण्यात आला होता. मात्र, या ऐतिहासिक दिवशी शहरातील ६ महत्त्वाचे सिग्नल बंद असल्याचे समोर आले. सहा महिन्यांत विजेअभावी, तांत्रिक अडचणींमुळे ४५१ वेळा सिग्नल बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी वाढत गेली आहे. सदोष सिग्नल यंत्रांमुळे अनेकदा सुरळीत वाहतूक बिघडते. वाहतूक पोलीस या सिग्नलची दुरुस्ती करतात. मध्यंतरी काही आयटी कंपन्यांनी सोलर पॅनल बसवून त्याद्वारे सिग्नल सुरू ठेवण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलीस आणि पालिकेला दिला होता. वाहतूक पोलिसांनी या प्रस्तावाला तोंडी मान्यता दिली. परंतु, पालिकेमध्ये जाऊन हा प्रस्ताव मागे पडला. पीएमपीच्या मालकीची बस रस्त्यावर बंद पडल्यानंतर चालक तातडीने वायरलेस विभागाशी संपर्क साधतो. त्यानुसार ब्रेकडाउन व्हॅन घटनेच्या ठिकाणी पाठविली जाते. त्याचठिकाणी बस लगेच दुरुस्त होत नसेल, तर ती आगारामध्ये आणली जाते. त्यासाठी जास्तीत जास्त एक तासाचा कालावधी पुरेसा असतो. पण, ठेकेदारांकडील बंद बस दुरुस्त करण्याची जबाबदारी पीएमपीची नाही. त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते. अनेकवेळा ठेकेदारांकडील बस लवकर दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली.सिग्नल व्यवस्था निर्दोष आणि सुरळीत चालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. वाहतूक पोलीस ही वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा असली, तरी त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी अन्य यंत्रणांची मदत घ्यावी लागते. सिग्नल व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्याला बॅकअप असणे आवश्यक आहे. रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपी बस तातडीने हटविल्या पाहिजेत. वाहतूककोंडी दूर करणे ही वाहतूक पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही जबाबदारी आहे.- सारंग आवाड (उपायुक्त, शहर वाहतूक पोलीस)
नादुरुस्त बसमुळे वाहतुकीला खो
By admin | Updated: August 7, 2015 00:31 IST