कल्याणराव आवताडे
धायरी: माणुसकी, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सलोखा, भावना या आजच्या जगात नाहीशा आणि काहीशा दुर्मिळ झालेल्या गोष्टी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील श्री वरद सहकारी गृहरचना सोसायटीत दिसून येत आहेत. १६ सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या सोसायटीला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. पुणे मराठी ग्रंथालयाची शाखाही सोसायटीत असल्याने वाचन संस्कृती वाढविण्याचे काम सोसायटीधारक करत आहेत.
सुरुवातीच्या काळात विठ्ठलवाडी भागात लोकवस्ती कमी होती. नंतर शहरी गजबज वाढली, तसे मुख्य पेठांतील, शहरातील लोक या सिंहगड रस्ता परिसरात वळले. मग बंगले आले, इमारती उभ्या राहू लागल्या. सोयीसुविधा वाढल्यानंतर १९७० मध्ये विठ्ठलवाडी परिसरातील श्री वरद सहकारी गृहरचना सोसायटीची निर्मिती करण्यात आली. परिसरातील ही पहिली सोसायटी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सोसायटीत म्हणजे जवळपास १०० जणांचे हे एक कुटुंबच आहे.
सोसायटीत वेळोवेळी सोसायटीत स्वच्छता अभियानही सुरूच असते. मागील उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र होती, परंतु या सोसायटीतील गृहिणींनी त्यावर सहज मात केली. पाण्याचे नियोजन केले. पाणी कमी वापरण्यावर भर दिला. रहिवाशांचा व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील आहे. त्यामुळे सर्वच रहिवासी एकमेकांशी जोडले गेले आहेत. नियोजनबद्ध व्यवस्थापन हे या सोसायटीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कमिटी मेंबर्स उत्तम असल्याने रहिवाशांना सोसायटीच्या कामाबाबत कधीच कोणतीही समस्या उद्भवत नाही. या सोसायटीचे अध्यक्षा सुरेख निरगुडकर, कार्यवाह अनंत आठवले, सदस्य राजीव आठवले, अरविंद आयाचित, संदीप शहाणे, दिलावर गवंडी, कुमार देशमुख, सुहास मुंगळे, डॉ. हिरेन निरगुडकर, आप्पा मोरगांवकर, सुधाकर जाधव यांचादेखील सक्रिय सहभाग असतो. तसेच शिरीन गवंडी, शीतल बारटक्के, योगिनी भुरके, स्मिता कटके आदी महिलाही अनेक उपक्रमांत पुढाकार घेत असतात.
सध्या सोसायटीत पुणे मराठी ग्रंथालयाची शाखादेखील सुरु करण्यात आली असून, ही फक्त केवळ सोसायटी नसून एक कुटुंबच असल्याचे सोसायटीचे सदस्य सुहास मुंगळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.