भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांना केळवडे (ता. भोर) येथून जात असलेल्या संभाव्य रिंगरोडला विरोध दर्शवण्यासाठी हरकत असल्याबाबत या संबंधित शेतकऱ्यांनी अर्ज दिला आहे.
या रिंगरोडमुळे भोर तालुक्यातील भोर तालुक्यातील खोपी, केळवडे, कांजळे, कुसगाव, शिवरे व रांजे; तर हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, मोरदरी, घेरा सिंहगड या गावात प्रामुख्याने बागायती जमिनी आहेत. अवघ्या कुटुंबाचे आयुष्य अवलंबून असलेली जमिनी व घरे रिंगरोडमध्ये जाणार असल्याने येथील शेतकरी चिंतेत असून रिंगरोडला तीव्र विरोध करणार आहेत. केळवडे गावासह कांजळे, खोपी, कुसगाव या शेती प्रधान भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व राहती घरे यां रिंगरोडमध्ये जात असल्याने त्यांचेवर परागंदा होण्याची वेळ या शेतकऱ्यावर येणार आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. येथील शेतकऱ्यांचा या शेतजमिनीतून आपला उदरनिर्वाह होतो आहे. शेतजमीन जर रिंगरोडमध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येणार आहोत तसेच अनेक शेतकरी भूमीहीन होतील त्यामुळे शासनाने या प्रस्तावित भागातून जाणाऱ्या रिंगरोडला स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी येथील बाळासाहेब धुमाळ, महेश कोंडे, जितेंद्र कोंडे, जगन्नाथ कोंडे, शंकर कोंडे, धनाजी धुमाळ, राजेंद्र कोंडे आदी बाधीत शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत शासकीय यंत्रणेकडून रिंगरोडबाबत पुरेसा दुजोरा मिळालेला नसला तरी या शेतकऱ्यांच्या काळजात त्यामुळे धस्स झाले आहे.
प्रस्तावित रिंगरोडला विरोध दर्शवित या प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केळवडे (ता. भोर) येथील २८ शेतकऱ्यांनी केली आहे.