पिंपरी : पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज गुल झाल्याने नागरिकांची सलग दोन दिवस गैरसोय झाली. वीजेअभावी उकाड्याने आणि डासामुळे नागरिकांची झोप मोड झाली. बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करण्याची पाळी आली. दुसऱ्या दिवशी रविवारी अनेक भागांत पाणी पुरवठा न झाल्याने ऐन पावसाळ्यात अनेकांना आंघोळीशिवाय साप्ताहिक सुट्टी घालवावी लागली. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण झाले. दुपारपासून शहरातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या. सायंकाळनंतर शहर परिसरासह मावळ तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले. या पावसाने शहरातील अनेक भागांतील वीज गुल झाली. रात्रभर वीज नव्हती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची वार्षिक परीक्षा घेतली जात आहे. तसेच, दहावीच्या परीक्षा दोन दिवसाावर येऊन ठेपली आहे. मंगळवारी पहिला पेपर आहे. या विद्यार्थ्यांची वीजेअभावी मोठी गैरसोय झाली. या विद्यार्थ्यांना नाइलास्तव अंधारात मेणबत्तीच्या अपुऱ्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. अंधारात घरातील स्वयंपाक आणि इतर कामे उरकावी लागली. वीज नसल्याने बाजारपेठेतील दुकाने लवकर बंद केली गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज नसल्याने मोटार पंप बंद होते. इमारतीमध्ये तसेच, हौंसीग सोसायट्यामध्ये पाणी पुरवठा झाला नाही. (प्रतिनिधी)
परीक्षा काळातच विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
By admin | Updated: March 2, 2015 03:05 IST