पिंपरी : धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घेणे अपरिहार्य बनले आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही आता दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. सोमवारी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा, असे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना सांगितले.जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहरअभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, लियाकत पीरजादे आदी उपस्थित होते. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पावसाने दडी मारली आहे. धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पवना धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा आहे. धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला पुरविण्यात येते. काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने काटकसरीने पाणी वापरण्याचे धोरण अवलंबणे अनिवार्य बनले आहे. पावसाचे दोनच महिने उरले आहेत. त्या कालावधीत पुरेसा पाऊस होईलच हे सांगता येत नाही. भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. ही बाब गांभीर्याने घेऊन नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील काळातील पाण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय मर्यादित काळासाठी न ठेवता कायम अंमलबजावणी करावी लागणार आहे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.(प्रतिनिधी)
शहराला आता दिवसाआड पाणी
By admin | Updated: July 14, 2014 04:52 IST