मायक्रो आर्टीस्टची कमाल, तांदळाच्या 4,042 कणांवर लिहिली 'भगवद् गीता'

By महेश गलांडे | Published: October 20, 2020 12:35 PM2020-10-20T12:35:37+5:302020-10-20T12:56:41+5:30

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय. प्राचीन भरतवर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे.

अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत. आपल्या प्राणसख्या असणा-या अर्जुनाला ते त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय.

मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते.

मानवी जीवन हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो.

हिंदूंचा पवित्र ग्रंथ म्हणून या भगवद् गीता ग्रंथाचे पूजन केले जाते. विशेष म्हणजे न्यायालयातही हिंदू व्यक्तीच्या खटल्यात या ग्रंथावर हात ठेऊनच शपथ दिली जाते.

हैदराबादमधील लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थीनीने चक्क तांदळाच्या कणांवर संपूर् भगवद् गीता लिहिली आहे. ही विद्यार्थींनी देशातील पहिली मायक्रो आर्टीस्ट असल्याचं दावा करण्यात येत आहे.

रामगिरी स्वरिका असं या राईस आर्टीस्ट विद्यार्थीनीचे नाव असून तांदळांच्या 4,042 कणांवर तिनेही ही गीता लिहिली आहे. त्यासाठी, तब्बल 150 तासांपेक्षा अधिकचा कालावधी तिला लागला.

मायक्रो आर्ट बनविण्यासाठी विविध संस्थासोबत आपण काम करत असल्याचं स्वरिकाने म्हटलंय. स्वरिकाला दुध कला, कागदावरील नक्षी आणि इतर उत्पादनांसह तिळांवरही सुक्ष्म रेखाटन तिने केलंय.

काही दिवसांपूर्वी स्वारिकाने केसांवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहली होती, त्यासाठी तेलंगणा सरकारने सन्मानित केले होते.

राष्ट्रीय स्तरावर आपली कलाकूसर दाखवल्यानंतर आता, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही कला पोहोचविण्याचा मानस स्वरिकाने व्यक्त केला आहे.

2019 साली दिल्ली सांस्कृतिक अकॅडमीतून राष्ट्रीय पुरस्कारानेही स्वरिकाला सन्मानित करण्यात आलंय. तसेच, देशातील पहिली मायक्रो आर्टीस्ट म्हणून तिचौ गौरवही करण्यात आला.

भविष्यात वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, न्यायाधीश बनण्याची इच्छा असल्याचं स्वरिकाने म्हटलंय, मुलीसांठी प्रेरणादायी काम करण्याचंही तिचं उद्दिष्ट्य आहे.