शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पुलाच्या पलीकडे..

By admin | Updated: August 11, 2016 16:03 IST

मुलांनी घेतलेले निर्णय पालकांना अति धाडसी, चुकीचे वाटतात, त्यामुळे ते या निर्णयांना विरोध करतात ! तर पालकांचं वागणं मुलांना अक्षरश: असह्य होतं.. ‘असंच कर, तसंच कर, आमच्यावेळी असं नव्हतं..’ असे उपदेशाचे डोस सुरू झाले, की पोरांची टाळकी भडकतात ...मग कुणीच कुणाशी बोलत नाही. कसा सुटणार हा तिढा?

- डॉ. श्रुती पानसे
 
जनरेशन गॅप हा तसा फार जुना शब्द. जुनी संकल्पना. शतकांपासून चालत आलेली. संकल्पना जुनी, तरीही प्रत्येक पिढीला परिचित.दोन पिढ्यांमधला विसंवाद तसा नेहमीचाच. त्याचं प्रमाण फक्त कमी जास्त एवढंच. नव्या पिढीला आधीची पिढी कायमच झापडबंद, पारंपरिक वाटत आलीय, तर जुन्या पिढीला नवी पिढी म्हणजे वाया गेलेले, संस्कारहीन.. वगैरे वगैरे.. आचार-विचारातला हा झगडा नेहमीचाच आहे. त्याला अपवाद अगदी अपवादापुरताच. या दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद झाला तरंच ती आश्चर्याची गोष्ट!समाज बदलतो, माणसं बदलतात, विज्ञान- तंत्रज्ञानात नवे शोध लागतात. शाश्वत मूल्यं तीच असली तरी मूल्यांच्या हाताळणीत बदल होतो. अशा परिस्थितीत, पंचवीस वर्षांपूर्वी आपण ज्या आधारावर निर्णय घेतले, त्याच आधारावर माझ्या मुलीने किंवा मुलाने निर्णय घ्यावेत, हा आग्रह प्रत्येक पिढीकडून धरला जातो.विसंवाद होतो तो इथेच.मुलांनी घेतलेले निर्णय पालकांना अति धाडसी, चुकीचे वाटतात, त्यामुळे ते त्याला विरोध करतात, तर पालकांचं वागणं मुलांना अक्षरश: नाकीनव आणतं. ‘असंच कर, तसंच कर, आमच्यावेळी आम्ही कधी असं केलं नव्हतं..’ असे उपदेशाचे डोस सुरू होतात.उपदेशांची ही धार येता जाता डोक्यावर कायम पडत असली की, मुलं बिथरतातच, त्यामुळे त्यांचाही अडेलतट्टूपणा सुरू होतो. बऱ्याचदा तर, ‘तुम्ही सांगता ना, म्हणूनच मी त्याच्या नेमकं विरुद्ध करणार’ असा पवित्रा मुलांकडून घेतला जातो आणि घराघरात महायुद्धाला सुरुवात होते. दोघांकडून दोन्ही बाजू ताणून धरल्या जातात. भांडून-तंडून झालं, की बऱ्याचदा शीतयुद्धाला सुरुवात होते. पालकांचं तोंड एकीकडे, तर मुलांचं तोंड नेमकं त्याच्या विरुद्ध दिशेला.या शीतयुद्धाचाही भडका, स्फोट कधी ना कधी होतोच. त्याचे परिणाम वाईटच होतात. मनात कायमची बोच लागून राहते ती राहतेच. योग्य तऱ्हेने संवाद झाला नाही, मनातली किल्मिषं निघाली नाहीत तर ही दुखावलेली मनं कायम तशीच राहतात.खरंतर या गोष्टी सामंजस्यानंच सुटू शकतात. कोणीही एकानं आततायीपणा केला, की दुसऱ्याकडूनही त्याचीच री ओढली जाते.हे टाळता येतं. टाळायला हवं. एकाचं डोकं तापलं असेल तर दुसऱ्यानं शांत राहायला हवं. दोघांनीही एकमेकांच्या भूमिकेत शिरायला हवं. अगदी ‘परकाया प्रवेश’ तसा अशक्यच, पण त्यादृष्टीनं प्रयत्न झाला, तर किमान दुसऱ्याचं म्हणणं तरी समजायला मदत होते. विरोध मग इतका टोकेरी आणि कड्यावरचा राहत नाही.पालकांनी आपल्या मुलांना, त्यांना जे वाटतं ते सुचवावं. चर्चा करावी. मात्र अंतिम निर्णय मुलांना घ्यायला सांगावं. अर्थातच, या निर्णयाची जबाबदारीदेखील मुलांनीच घ्यावी, हे ही समजावून सांगावं. या निर्णयातून चांगलं व्हावं, हीच अपेक्षा असते. पण वाईट झालं तर कुटुंबाने धीर द्यावा. आधार द्यावा. यातूनच तर स्वतंत्र निर्णयक्षमता विकसित होईल.आपल्याकडे अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. मुलं सज्ञान झाली आहेत असं समजून. पण मुलं खरोखरंच सज्ञान होतात का? आसपासच्या परिस्थितीचं भान त्यांना यावं, ज्ञान मिळावं, म्हणून जी मोकळीक द्यायला हवी, सारासार विचार करण्यासाठी सुद्धा मनाचं, विचारांचं स्वातंत्र्य आवश्यक असतं, ते मुलांना मिळत नाही. आधी घरातून आणि शाळातून मुलांचे विचार विकसित व्हावेत यासाठी नियोजन करावं. अशा प्रयत्नांमुळे ते कायद्यानं तर सज्ञान होतीलच, पण विचारांनीही होतील. त्याचा त्यांना स्वत:ला आणि सगळ्यांनाच उपयोग होईल. काही पालकांना हे भान असतं. त्यांची काही खरीखुरी उदाहरणं. अशा पालकांची ही काही वाक्यं.. ‘दहावीनंतर तुला नक्की कोणत्या क्षेत्राकडे जायचंय, हे तुझं तू ठरव. हवं तर आपण चर्चा करून ठरवू. तुला तुझं ठरवता येत नसेल तर मार्गदर्शक तज्ञ व्यक्तीचा, प्राध्यापकांचा सल्ला घेऊ. आम्ही तुझ्याबरोबर येतो. पण चर्चा तू कर. तुझा मार्ग तू शोध.’‘मला वाटत होतं, माझ्या मुलीला कायमच नव्वद टक्क्यांच्या आसपास मार्क मिळतात. तर तिनं शास्त्रशाखेकडे जावं. एकदा या शाखेकडे जाऊन बारावी झालं की पुढे अनेक मार्ग खुले होतात. तिला हवं तिथे ती जाऊ शकते. समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिला आर्ट्सकडेच जायचं होतं. तिला तत्त्वज्ञान किंवा मानसशास्त्र घ्यायचंय हे तिचं पक्कंच होतं. म्हणून मग आम्ही तिला हवं ते करू दिलं. बघू या.’ ‘एमेस्सी झालंय मुलाचं. कृषी विषय घेऊन. असं वाटलं होतं प्राध्यापक होईल. पण त्याला प्रत्यक्ष शेतीच करायची आहे. इकडे लोक आपली शेतीभाती विकून बिल्डर व्हायला निघालेत. नाहीतर बिल्डरकडे जागा विकून घरं बांधताहेत, आॅफीसेस बांधताहेत. आम्ही इतकी वर्षं शेतीत घालवली. त्यानं शेतीच करावी असं आमचं काहीच म्हणणं नव्हत. पण वाटलं होतं महिन्याच्या महिन्याला पगार मिळेल असं काहीतरी करावं. त्याची ओढ शेतीकडेच आहे, तर तो जे म्हणेल ते! ’‘आम्ही दोघंही सरकारी नोकरीत आहोत. मुलीनं तिला हवं तेच करावं, असं आम्ही तिच्याशी लहानपणापासून बोलतोय. तिला तिचं क्षेत्र शोधण्यात मदतही केली. तिचा कल आहे फोटोग्राफीकडे. आम्ही आहोत तिच्या पाठीशी. आम्ही तिला म्हटलंय तर खरं, की तुला हवं ते कर. पण खूप धास्ती वाटतेय. हे खूपच बेभरवशाचं क्षेत्र आहे. इकडे स्वतंत्र व्यवसाय करायचा तर निभाव कसा लागणार? फोटोग्राफी शिकून, करून असे किती पैसे मिळणार?’‘एका इडियटची गोष्ट’ नावाच्या एका पुस्तकात एका मुलीने ‘आपल्याला आयुष्यभर काय करायचंय’ याचा वर्षभर शोध घेतला. या काळात ती खूप फिरली. वेगवेगळ्या माणसांना भेटली. त्यांच्याकडून सर्वकाही समजून घेतलं. त्यानंतर तिनं तिचा व्यवसाय ठरवला. यासाठी तिला तिच्या पालकांची साथ होती.जग बदलतंय, त्या प्रमाणात पालकांनीही बदलायला हवं. त्यासाठी संवाद हाच एक मार्ग आहे. मात्र हा संवाद दुतर्फा हवा. संवादाच्या ‘वन वे’तून सुटण्याचा हाच मार्ग आहे ! दुसऱ्याला जिंकवलंत,तरच आपला ‘विजय’!घरातल्या आणि एकमेकांना अतिप्रिय असलेल्या माणसांविरुद्ध इच्छा नसतानाही शस्त्रं परजणं केवळ अर्जुनासाठीच नाही, प्रत्येकासाठीच खूप अवघड गोष्ट असते. यात जिंकत कोणीच नाही, काहीही घडलं तरी प्रत्येकाची हारच होत असते.दुसऱ्याला जिंकवलं, तर आपणही आपोआपच जिंकत असतो. त्याठीचीही ही आगळी कृष्णनीती..* एकमेकांशी बोला. मनापासून बोला. नुसते उपदेश किंवा तक्र ारी मात्र नकोत. आपण चुकत असू, तर ते मान्य करा. नुसत्या गप्पा मारण्यासाठी आपल्या मुलामुलींना कडकडून भेटा.* आपण सारे घरात नेहमीच भेटतो. आता बाहेर भेटा. बागेत भेटा, हॉटेलमध्ये भेटा. मनमोकळ्या गप्पा मारा. * मुलं मोठी होताहेत यावर जसा पालकांनी विश्वास ठेवायला हवा, तसंच आपले पालक तर अनुभवानं आपल्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत, त्यांना समजेल, पटेल, रु चेल अशा भाषेत मुलांनीही बोलायला हवं. त्यांना समजून घ्यायला आणि समजावून सांगायला हवं. (लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

drshrutipanse@gmail.com