- वसीम अक्रम लिहितो़
दक्षिण आफ्रिका संघाला खेळपट्टीपेक्षा ढासळलेल्या मानसिकतेचा फटका बसला आहे. अन्यथा बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात येण्यासाठी दुसरे कुठले कारण दिसत नाही. या खेळपट्टीवर चेंडूला काही ‘स्क्वेअर टर्न’ मिळत नव्हता, पण दक्षिण आफ्रिका संघाची मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक होती. तिसऱ्या दिवसाची खेळपट्टी असती तर कारण समजण्यासारखे होते, पण पहिल्याच दिवशी जर झटपट डाव संपुष्टात येत असेल तर तुम्ही दुसऱ्यावर दोषारोप करू शकत नाही. पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय धाडसी होता. पहिल्या दिवशी फलंदाजी स्वीकारत प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हान निर्माण करणे अपेक्षित होते. भारतीय कर्णधाराला दक्षिण आफ्रिका संघाच्या मानसिकतेची कल्पना आली असावी, त्यामुळे त्याने कदाचित असा धाडसी निर्णय घेतला असेल. दक्षिण आफ्रिका संघाने फटकावलेल्या एकूण धावांपैकी ८० टक्के धावा एकट्या एबी डीव्हीलियर्सने फटकावल्या. जडेजाने शानदार पुनरागमन केले. त्याने रणजी स्पर्धेत खेळताना आपल्यातील उणिवा दूर करताना ३० बळी घेतले. आश्विन सध्याच्या काळात जगातील सर्वोत्तम आॅफस्पिनर आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. भारत मालिकेत वर्चस्व गाजवेल, असे मत आताच व्यक्त करणे घाईचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेला मात्र सकारात्मक मानसिकतेने खेळावे लागेल. त्यांनी भारतातील खेळपट्ट्यांबाबत तक्रार करायला नको. भारतीय उपखंडात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या असतात, हे सांगण्यासाठी कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. फिरकीपटूंना खेळण्याचे तंत्र वेगळे असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तंत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे. फिरकीपटूंविरुद्ध यशस्वी ठरण्यासाठी स्ट्राईक रोटेट करणे, संयम बाळगणे आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा स्वीकारणे आवश्यक ठरते. दक्षिण आफ्रिका संघ संघर्ष करीत आहे, असे आताच बोलणे घाईचे ठरेल. विदेशात दक्षिण आफ्रिका संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दक्षिण आफ्रिका संघ वेगळ्या कारणांमुळे संघर्ष करीत आहे. एजी बॉलवर रिव्हर्स स्विंग मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. चेंडूकडे लक्ष देण्याची पद्धत आता कालबाह्य ठरली आहे. १९९० मध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना आम्ही चेंडूवर अधिक लक्ष देत असल्याची मला आठवण आहे. आम्ही ८० षटकांनंतर नवा चेंडू घेण्याचे टाळत होतो आणि १०० व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करीत होतो. जुना चेंडू रिव्हर्स होत होता. दोन दिवस पावसामुळे खेळ शक्य न झाल्यामुळे बंगळुरू कसोटी निकाली ठरण्याची शक्यता धूसर होत आहे. पण, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवण्याचे सर्व प्रयत्न करायला हवेत. मोठी खेळी न करता आल्यामुळे हाशिम आमलाचे नेतृत्व प्रभावित झाले आहे. त्याच्यावर दडपण जाणवत आहे. तो शैलीदार फलंदाज असून यातून लवकरच मार्ग काढण्यात तो यशस्वी ठरेल. धावा फटकावण्यासाठी फलंदाजाने खेळपट्टीवर वेळ घालवणे आवश्यक आहे, असा सल्ला मी आमलाला देईल. आक्रमक पवित्रा स्वीकारण्यापेक्षा खेळपट्टीवर वेळ घालविला म्हणजे धावा आपोआप होतील. फिरकीपटूंविरुद्ध फाफ डू प्लेसिसचे तंत्र सदोष आहे. वन-डे व टी-२० क्रिकेटचा त्याच्यावर प्रभाव आहे. फिरकीपटूंविरुद्ध पुढे सरसावत फटके मारण्याची पद्धत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरते, पण कसोटी क्रिकेटमध्ये नाही. तो कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे, याची मला कल्पना आहे, पण त्याला तंत्रामध्ये सुधारणा करावी लागेल. (टीसीएम)