विनय नायडू, मुंबई - प्रशिक्षक म्हणून अनेक पावसाळे पाहिलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे कोच जॉन राईट हे संघाच्या बुधवारच्या सामन्यातील कामगिरीवर नाराज झाले आहेत. पहिल्या पाच पराभवानंतर फ्लेआॅफ गाठण्याची किमया करणार्या संघाला या परिश्रमाचं सार्थक करता आले नसल्यामुळे जॉन राईट नाराज झाले आहेत. चेन्नईकडून एलिमिनेटर राउंडमध्ये पराभूत झाल्यानंतर राईट म्हणाले, ‘‘या सामन्यापूर्वी आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. कारण आयपीएल स्पर्धेचा इतिहास पाहिल्यावर असे लक्षात येईल, की चेन्नई जरी बलाढ्य संघ असला तरी मुंबई इंडियन्सने त्यांना नेहमीच कडवी लढत दिली आहे. पण कालच्या सामन्यात त्यांनी सर्वांगीण सुंदर खेळ केला, याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. आम्ही चेन्नईला १७४ धावांचे लक्ष्य दिले; परंतु ते तितके पुरेसे नव्हते. आम्ही आणखी २0-२५ धावा कमी केल्या. ९.४ षटकांत आमच्या ७६ धावा झाल्या होत्या, त्यावरून आम्ही १९0 चा पल्ला गाठायला हवा होता. शिवाय गोलंदाजी करताना लवकर बळीही मिळवू शकलो नाही. आम्ही आमचा खेळ उंचावू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला शिक्षा भोगावी लागली, असेही राईट म्हणाले. राजस्थान रॉयल्सवर ज्याप्रमाणे विजय मिळविला, त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची गरज होती. तो सामना आमच्या इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट सामना होता. तसे आम्ही चेन्नईविरुद्ध खेळलो असतो, तर आम्हाला विजयाची संधी मिळाली असती; पण सर्व दिवस सारखे नसतात. गोलंदाजीमध्ये प्रवीणकुमार आणि हरभजनसिंग यांनी चांगली कामगिरी केली असली तरी आम्हाला आमचा मुख्य गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव भासली. तो अतिशय दर्जेदार गोलंदाज आहे. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात तो श्रीलंका संघातून इंग्लंड दौर्यावर गेला असल्यामुळे उपलब्ध नव्हता. त्याच्या नसण्याने आमचा तोटा झाला, असे राईट यांनी सांगितले.
‘राँग’ कामगिरीमुळे ‘राईट’ नाराज
By admin | Updated: May 30, 2014 04:16 IST