नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) वेगवेगळी वादग्रस्त विधाने करीत असताना आता यामध्ये पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी देखील उडी घेतली आहे. भारत-पाक संभाव्य द्विपक्षीय मालिकेच्या वादाला आणखी तीव्र करताना पाक मीडियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) भूमिका योग्य नसून, त्यामध्ये स्वार्थपणा दिसून येत आहे, असे म्हटले आहे.पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये ‘बीसीसीआयची अयोग्य भावना’ या मथळ्याखाली लिहिले आहे की, पाकिस्तानविरुद्ध यूएईमध्ये खेळण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे. यावरून त्यांच्यातील स्वार्थ स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच बीसीसीआय द्विपक्षीय क्रिकेट संबंधाचा सन्मानही नाही करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या भविष्य दौरा कार्यक्रमानुसार (एफटीपी) दोन्ही देशांदरम्यान दहा वर्षांसाठी सामन्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.भारत-पाक यांच्यात सातत्याने वाढणाऱ्या वादांमुळे संभाव्य मालिकेसंबधी संभ्रम निर्माण झाले आहेत. त्याच वेळी बीसीसीआयने मर्यादित षटकांची द्विपक्षीय मालिका भारतात खेळविण्याचा प्रस्तावही पीसीबीसमोर ठेवला आहे. या सर्व घडामोडींनुसार पाक मीडियाने थेट भारतीय स्थितींवर हल्ला करताना सांगितले की, भारतासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. तसेच, मुसलमानांविरोधात हिंसा आणि गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. शिवाय शिवसेनेकडून पाक नागरिकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मात्र, ही मालिका भारतात खेळविण्यामागचे कारण वेगळेच आहे. जर का ही मालिका भारतात खेळवली गेली तर प्रसारण अधिकार, तिकीटविक्री आणि जाहिराती हे सर्व भारताकडे राहील. मात्र, हीच मालिका यूएईमध्ये खेळविल्यास हे सर्व अधिकार पाकिस्तानला मिळतील. याच वृत्तपत्राने आणखी आग ओकताना लिहिले की, भारताच्या या ब्लॅकमेलिंगला रोखण्यासाठी पाक सरकार आणि पीसीबी अध्यक्ष चांगले प्रयत्न करीत आहेत.(वृत्तसंस्था)
पाक प्रसारमाध्यमांचा बीसीसीआयवर हल्ला
By admin | Updated: November 19, 2015 04:45 IST