नवी मुंबई : गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मलप्रक्रिया केंद्र देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे सभा गुंडाळण्यात आली. प्रस्तावात अर्थकारण दडले असल्यामुळेच त्याला स्थगिती दिल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.नेरुळ, वाशी व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचा एकूण ११ कोटी २४ लाख ६६ हजार ३८९ रुपये प्रतिवर्षी खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. तीनही प्रस्ताव यापूर्वी १६ सप्टेंबरच्या बैठकीतही मंजुरीसाठी आले होते. त्यावेळीही या प्रस्तावांना स्थगिती मिळाली होती. गुरुवारी पुन्हा समितीपुढे आलेल्या या प्रस्तावांना सभागृह नेते जयवंत सुतार यांनी स्थगिती मागितली. आयुक्तांच्या उपस्थितीतच या प्रस्तावांवर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु हे प्रस्ताव स्थगित ठेवल्यास इतरही दोन प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी नगरसेवक रामचंद्र घरत यांनी केली. परंतु प्रस्तावात अर्थकारण दडल्यामुळे त्याला सतत स्थगिती मिळत असल्याचा आरोप नगरसेवक शिवराम पाटील यांनी केला. तसेच पंचमहाभुतांची पूजा झालेली नाही का ? असाही टोला त्यांनी मारला. मलप्रक्रिया केंद्रात शुध्द केलेले पाणी खरेदीसाठी एक कंपनी सरसावली होती. त्यांना २ रुपये ५० पैसे लिटर दराने पाणी दिले जाणार होते. यामुळे सुमारे ७० कोटी रुपयांचा वार्षिक नफा पालिकेला होणार होता. मात्र कोणीतरी प्रतिलिटर २५ पैशाप्रमाणे रकमेची मागणी केल्याने कोणतीच कंपनी पाणी खरेदीसाठी पुढे न आल्याचाही आरोप पाटील यांनी केला.मलप्रक्रिया केंद्र म्हणजे पांढरा हत्ती झाले असून त्यांच्या देखभालीवर अनावश्यक खर्च होत असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर मढवी यांनी केला. शहरातील सहा मलप्रक्रिया केंद्राची एकूण क्षमता ४२४ दशलक्ष लिटर असतानाही त्याठिकाणी अवघ्या १८२ दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रियेसाठी येत आहे. त्यामुळे देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्चाची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले. मात्र विरोधकांची मागणी डावलून बहुमताच्या आधारे सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रस्तावाला स्थगिती दिली. यामुळे संतप्त झालेल्या रामचंद्र घरत यांनी माईक आपटून राग व्यक्त केला. विरोधकांकडून स्थगितीची मागणी झालेल्या प्रस्तावात चर्चेसाठी काही महत्त्वाचे नव्हते, यामुळे त्यास मंजुरी दिल्याचे सभापती शिर्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दिघा येथील अनधिकृत बांधकामावर सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांच्याकरिता तात्पुरत्या निवाऱ्याची सोय तसेच येत्या काही दिवसात दिघा येथे रस्ता रुंदीकरणादरम्यान होणाऱ्या कारवाईत रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या सर्वांवर काही सदस्यांना स्थायी समितीच्या बैठकीत बोलायचे होते. परंतु सत्ताधारी व विरोधक यांच्यात झालेल्या शाद्बिक चकमकीमुळे सभापतींनी सभा तत्काळ उरकली. यामुळे सदर विषयावर चर्चा न करता आल्याचा संताप नगरसेविका अपर्णा गवते, नगरसेवक शिवराम पाटील, मनोहर मढवी, जगदीश गवते आदींनी केला. त्यांनी सभा संपल्यानंतर सभापती नेत्रा शिर्के यांना धारेवर धरत आपला रोष व्यक्त केला.
स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 23:34 IST