नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधून रोज जवळपास ८० टन ओला कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यातून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारावा असा प्रस्ताव महापालिकेने एपीएमसीला दिला असून प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथील विविध मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी १२ हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. कांदा, भाजी व फळ मार्केटमध्ये रोज ७०० ते ८०० वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. या तीन मार्केटमधून रोज जवळपास ८० टन कचरा तयार होत असतो. हा कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत असतो. यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही केले होते. परंतु प्रशासनास सिडकोकडून जागाच उपलब्ध झाली नसल्यामुळे तो प्रकल्प बारगळला होता. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गत आठवड्यात बाजार समितीला भेट देवून पाहणी केली. येथील अनधिकृत बांधकाम, कचरा व इतर गोष्टींची पाहणी केली. तीन मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात ओला कचरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कचऱ्यावर प्रक्रिया केली तर सीएनजी गॅस तयार होवू शकतो अशी संकल्पना त्यांनी प्रशासनासमोर मांडली. बाजार समितीने स्वत: हा प्रकल्प राबवावा नाहीतर महापालिकेस तो राबविण्याची सहमती द्यावी असेही त्यांनी सुचविले.
कचऱ्यापासून सीएनजी
By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST