- नामदेव मोरे, नवी मुंबई
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. परंतु २५ वर्षांमध्ये शहरातील सर्व मालमत्तांचे सविस्तर सर्वेक्षणच झालेले नसल्याने पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे भविष्यात अत्याधुनिक जीआयएस तंत्राचा वापर करून सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याविषयी प्रशासकीय स्तरावर चाचपणी सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतानाच पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याकडे लक्ष दिले आहे. प्रमुख स्रोत असणाऱ्या एलबीटी व मालमत्ता करांसह सर्व विभागांच्या उत्पन्नाचा नियमित आढावा घेतला जात आहे. प्रशासनातील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होवू लागली आहे. २०१५ मध्ये एप्रिल ते जूनपर्यंत ८० कोटी रूपये कर वसूल झाला होता. यावर्षी ही रक्कम १२६ कोटी रूपये झाली होती. २३ जूनपर्यंत गतवर्षी ९१ कोटी व यावर्षी १३९ कोटी रूपये वसूल झाले होते. ३० जूनपर्यंत हाच आकडा गतवर्षी १०० कोटी व यावर्षी १६४ कोटी रूपये झाला आहे. कर वसुलीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केल्यामुळे हा फरक दिसू लागला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर विभागाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे येथील कारभारामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मालमत्ता कर विभागाने एकदाही शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण केलेले नाही. यामुळे अनेक मालमत्तांना कर लागलेला नाही. कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, नेरूळमध्ये अनेक बैठ्या चाळीच्या जागेवर तीन ते पाच मजली बांधकाम झाले आहे. रोडच्या बाजूला असणाऱ्या निवासी मालमत्तांचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. यामुळे त्यांच्या करआकारणीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. मालमत्ता कर विभागाकडील आकडे संभ्रमात टाकत आहेत. दोन महिन्यापूर्वी माहिती घेतली असताना शहरात ३ लाख ८ हजार ७८ मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सविस्तर माहिती घेतली असताना तो आकडा ३ लाख ७ हजार दाखविण्यात आला. परंतु यामधील फक्त २ लाख ९२ हजार मालमत्तांना बिले पाठविली होती. हा गोंधळ थांबविण्यासाठी व शहरातील सर्वच मालमत्ता कराच्या कक्षेत येण्यासाठी सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी जीआयएस तंत्राचा वापर केला जाणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तांची सविस्तर माहिती प्राप्त होवू शकणार आहे. याशिवाय करआकारणी करणेही सुलभ होवू शकते. मालमत्ता कर विभागाच्या कामकाजातील त्रुटी दूर झाल्या की सर्वेक्षणाविषयी प्रस्ताव तयार केला जाण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. मालमत्तांच्या आकड्यांचा घोळ; सर्वेक्षण होणे आवश्यकमहापालिका प्रशासनाने गतवर्षी आर्थिक स्थिती अहवाल सादर करताना शहरात २ लाख ९४ हजार ६१९ मालमत्ता असल्याचे स्पष्ट केले होते. यामध्ये २,४०,३३९ निवासी, ४८,९०६ वाणिज्य व ५३८४ औद्योगिक मालमत्ता असल्याचे सांगितले होते. परंतु प्रकाश कुलकर्णी यांच्या निलंबनानंतर प्रशासनाकडे माहिती विचारली असता त्यांनी ३ लाख ८ हजार ७८ मालमत्ता असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात विभागवार माहिती घेतल्यानंतर तो आकडा ३ लाख ७ हजार रूपये झाला व प्रत्यक्षात बिले २ लाख ९२ हजार मालमत्तांना देण्यात आली. मालमत्तांच्या आकड्यांचा हा घोळ कमी करण्यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीचा मुंढे पॅटर्न महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना २०१५ मध्ये १४६ कोटी रूपयांचे करवसुलीचे उद्दिष्ट दिले होते. वर्षभर नियोनबद्ध कामकाज करून त्यांनी प्रत्यक्षात २२९ कोटी रूपये महसूल संकलित केला होता. नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही त्यांनी करवसुली व कामकाजामध्ये सुधारणा करण्याचा सपाटा लावला आहे. गतवर्षी ३० जूनपर्यंत मालमत्ता करापोटी १०० कोटी रूपये वसूल झाले होते. मुंढे यांनी दोन महिन्यात करवसुलीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यावर्षी १६४ कोटी रूपये वसूल झाले आहेत.