पुणे, दि. २९ - नरेंद्र मोदींना त्यांचा अनुभव कामी आला तर राहूल गांधींकडे अनुभव नव्हता अशी परखड मीमांसा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुळे म्हणाल्या की राहूल गांधींनी मंत्रिपदही स्वीकारले नव्हते, ते जर मंत्री असते तर त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव असता आणि त्यामुळे जास्त प्रभावीरीत्या ते काम करू शकले असते.
नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले, परंतु काँग्रेस वा युपीएने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही हेदेखील त्यांनी नमूद केले. भाजपाची खेळी यावेळी यशस्वी ठरली युपीएची नाही एवढाच याचा अर्थ असल्याचेही त्यांनी सांगितले.