ऑनलाइन टीम
लखनौ, दि. २९ - उत्तरप्रदेशमधील बदायू येथे दोघा अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे.धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर नराधमांनी दोघा बहिणींचे मृतदेह गावातील एका झाडावर लटकवले होते.
बदायू जिल्ह्यातील कटरा गावात राहणा-या १४ आणि १५ वर्षाच्या दोघी चुलत बहिणी मंगळवारपासून बेपत्ता होत्या. या दोघी मंगळवारी संध्याकाळी शौचालयात जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघीही घरी परतल्याच नाही. बुधवारी रात्री या दोघींचे मृतदेह झाडावर लटकलेले आढळल्यावर या दोघींची हत्या झाल्याचे उघड झाले. नराधमांनी या दोघींवर सामूहिक बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे.
स्थानिक पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. मुली बेपत्ता झाल्यावर कुटुंबियांनी संशयित आरोपींची नावे पोलिसांना सांगितली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले असे मुलींच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. मुलींचे मृतदेह आढळल्यावर वरिष्ठ पोलिस अधिका-यांना जाग आली असून त्यांनी उसैत पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक मानसिंह चौहान यांनी सांगितले.