ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. २९ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मिरला भारतापासून वेगळे करण्यासाठी भारताविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे असे हाफिज सईदने म्हटले आहे.
इस्लामाबादमधील आबपारा चौकात हजारो समर्थकांसमोर त्याने ही गरळ ओकली असून तुम्ही काश्मिरमधील भाऊ-बहिनींच्या मदतीसाठी तयार आहात का? असा प्रश्नही त्याने उपस्थितांना विचारला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केल्याने काश्मिरमधील जनतेच्या पाठित खंजीर खुपसला असून काश्मिर जनता शरीफ यांना कधीच माफ करणार नाही. सईदने घेतलेल्या या रॅलीत जवळपास १० हजार लोक उपस्थित होते. यामध्ये आयएसआयचा प्रमुख हामिद गुल, तल्हा महमुद, जमात ए इस्लामीचा प्रमुखही उपस्थित होता. नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहून काश्मिर जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही सईद यांनी केला.