कापसाला उठाव नसल्याने भिवंडी कॉटन मार्केटवर परिणाम
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
भिवंडी : जागतिक बाजारातील मंदी उन्हाळ्यापर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कापसाला योग्य भाव न मिळाल्याने त्याचा फटका शहरांतील कॉटन व्यापारी व यंत्रमाग धारकांना बसला आहे.
कापसाला उठाव नसल्याने भिवंडी कॉटन मार्केटवर परिणाम
भिवंडी : जागतिक बाजारातील मंदी उन्हाळ्यापर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कापसाला योग्य भाव न मिळाल्याने त्याचा फटका शहरांतील कॉटन व्यापारी व यंत्रमाग धारकांना बसला आहे.शहर व परिसरांतील वातावरण कॉटन (सुती कापड) उत्पादनास योग्य असल्याने शहरांत अर्धेअधिक यंत्रमाग विविध प्रकारचे कॉटनचे कापड बनवित आहेत. कापसाला उठाव नसल्याने कॉटन सुताला भाव मिळत नाही. त्याचे भाव गडगडल्याने कापड बनविल्यानंतर त्यासही भाव मिळत नाही, अशी अवस्था कॉटन मार्केटची झाली आहे. कापसाला भाव न मिळाल्याने व त्याची उचल होत नाही़ यामुळे टेक्सटाईल इंडस्ट्रिमध्ये कापसाच्या गाठी पडून आहेत. कापसाच्या गाठीचे दर कमी करूनही तो न विकला गेल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. तसेच कापड मार्केटमध्ये योग्य दर मिळत नसल्याने मुंबईचे कापड व्यापारी भिवंडीतील यंत्रमाग धारकांना कापड विणण्यासाठी बीम देत नाहीत. त्यामुळे काही कारखानदारांनी कामगार कपात केली आहे. व्यवसायात तग धरण्यासाठी कारखान्याच्या मालकांनी दोन शिफ्टची एक शिफ्ट करत कारखाने सुरू ठेवले आहेत. उन्हाळ्यात कॉटनची मागणी वाढण्याची शक्यता टेक्सटाईल मार्केटच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्याची वाट पाहत यंत्रमागधारक कारखान्याचा गाडा ढकलत आहेत.राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेक्स्टाईल इंडस्ट्रिजमध्ये अशी संकटे येत असतात. त्याची लेखी नोंद सरकारच्या टेक्सटाईल विभागाकडे असली पाहिजे. त्याच प्रमाणे सरकारने कापूस शेतकर्यांपासून ते यंत्रमागधारक, यंत्रमाग कामगार व व्यापारी यांचीदेखील नोंद करून त्यांना मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी व स्थैर्य देण्यासाठी योजना जाहीर केली पाहिजे, असे टेक्सटाईल आभ्यासकांचे म्हणणे आहे.