औषध फवारणीने शेतकरी मेटाकुटीला
By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST
निमोणे : निमोणे आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनअसलेल्या हवामानातील अनियमितपणामुळे कांदापिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी औषध फवारण्या करून मेटाकुटीला आला आहे.
औषध फवारणीने शेतकरी मेटाकुटीला
निमोणे : निमोणे आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनअसलेल्या हवामानातील अनियमितपणामुळे कांदापिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी औषध फवारण्या करून मेटाकुटीला आला आहे.निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. शेतकर्यांना चार पैसे मिळवून देणारे हे नगदी पीक असल्याने छोट्या शेतकर्यांची या पिकासाठी पसंती असते. इतर पिकांच्या तुलनेत हे पीक घेणे जास्त किचकट असते. जराशाही हवामान बदलाने हे पीक त्वरित रोगग्रस्त बनते, तसेच या पिकासाठी लागवडीपासून थेट विक्रीपर्यंत एकरी किमान पन्नास हजार रुपये खर्च येतो. मात्र त्या तुलनेत उत्पादन आणि बाजारभाव मिळत नसल्याने या भागातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे.चालू वर्षीच्या रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून या भागात हवामानाची अनियमितता आहे. सातत्याने ढगाळ हवामान, अधूनमधून पाऊस, अल्पकाळातील थंडी यामुळे कांदा पीक रोगग्रस्त बनले आहे. या विपरित हवामानामुळे कांद्यावर करपा, मावा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची वाढ खुंटत आहे. या रोगांचा सामना करण्यासाठी शेतकर्यांना वारंवार महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. या महागड्या औषधांमुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाढत असून, औषध विक्रेत्यांचे मात्र उखळ पांढरे होत आहे. या रोगांबरोबरच हवामानातील अनियमितपणामुळे कांद्याला फुटवे येणे आणि ढेंगळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. करपा व मावा यांसारख्याा रोगाने उत्पादनात मोठी घट येते, तर फूट आणि ढेंगळ्यांमुळे कांद्याची प्रतवारी ढासळते. फू ट असलेल्या कांद्याला मार्केटमध्ये नीचांकी बाजारभाव मिळतो त्यामुळे त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. विक्रीसाठी असा माल गेल्यास वाहतूकभाडे, दलाली असासुध्दा खर्च निघत नसल्याने चांगल्या मालाच्या पीतून या खर्चाची बेगमी करावी लागते.परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हवामानाची अनियमिततता आहे. त्यामुळे शेतकरी वारंवार औषध फवारण्या करून मेटाकुटीस आला आहे. कांद्यावरचा रोग सुटेना आणि शेतकर्यांच्या पाठीवरचा औषधपंप हटेना असे सध्या परिसरात चित्र आहे. शिवाय एवढा उपदव्याप करूनही बाजाराभावांची हमी नाही, त्यामुळे शेतकर्यांच्या पदरी सातत्याने नैराशाचे माप आहे.त्यामुळे शासनाने या गरीब कांदा उत्पादक शेतकर्यांचा विचार करून रासायनिक खते व औषधांच्या किमती माफक कराव्यात. तयार कांद्यास हमीभाव द्यावा व या शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी शेतकर्यांची शासनाकडे आग्रही मागणी आहे.फोटो ओळ : 00000000000 १) निमोणे (ता. शिरूर) येथे रोगग्रस्त कांद्यावर औषध फवारणी करताना शेतकरी.