स्वप्निल जोशी ल्ल नाशिक१७५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालयासारख्या ज्ञानमंदिराला कोणाची तरी दृष्ट लागली आहे, हे मात्र नक्की. म्हणूनच की काय, सावानावर सत्तासिंहासन बळकाविण्यासाठी एकेमकांमध्ये लागलेली अहमहमिका यंदाच्या निवडणुकीत सामान्य सभासदांना विषण्ण करणारी ठरली. नाही म्हणायला, निवडणुकीत कोणीतरी एक जिंकत असतो तेव्हा कुणीतरी दुसरा हरणार असतोच. त्यामुळे ग्रंथमित्र पॅनल जिंकले आणि जनस्थानसह परिवर्तन पॅनल हरले, एवढेच त्यावर भाष्य करता येईल. ग्रंथमित्र का जिंकले आणि जनस्थान-परिवर्तन का हरले, याची चर्चा होत राहील. जिंकणारे यशाचे गुणगान गात असतील, हरणारे कुठे कमी पडलो म्हणून आत्मपरीक्षणात गुंतले असतील, परंतु या साऱ्या घटना - घडामोडींकडे सभासद आता तटस्थवृत्तीने बघतो आहे. गेल्या दशकभरात सावानाचा जो तमाशाचा फड उभा राहिला आहे, जो विद्वेषाचा वगनाट्य् सुरु आहे, तो आता थांबवावा, एवढीच माफक अपेक्षा सत्तारूढ झालेल्या ग्रंथमित्र पॅनलकडून सभासदांची असणार आहे. साहित्येतर चर्चा, आरोप प्रत्यारोप, शह-काटशह, एकमेकांची उणीदुणी, डावपेच आणि बनलेला राजकीय आखाडा यामुळे लक्ष लागून असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत सभासदांनी हवश्या-गवश्यांना दूर ठेवत वाचनालयाशी संबंधित उमेदवारांना प्रामुख्याने कौल दिला आहे. उपद्रवमूल्य उमेदवारांना खड्यासारखे बाजूला काढून ठेवण्याचा चाणाक्ष व चिकित्सकपणाही सुज्ञ सभासदांनी दाखविला आहे. प्रतिस्पर्धी पॅनलमध्ये काही चांगले उमेदवार असले तरीही निवडणुकीचा आखाडा म्हणून सावानाला प्राप्त झालेले स्वरूप सभासदांना रुचले नसल्याचे प्रतिबिंबही निवडणूक निकालातून उमटले आहे. अर्थात ग्रंथमित्र पॅनलला ज्या निर्विवादपणे सत्ता सोपविली त्यांनी तरी किमान कालचा गोंधळ थांबवून सावानाला उर्जितावस्था आणावी, अशी अपेक्षा व्यक्त झाली तर गैर ठरू नये.शहरातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा दांडगा अनुभव पाठीशी असणारे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घालून ठेवलेला घोळही आता चर्चेचा विषय बनला आहे. फेरमतमोजणी २४ तासांच्या आत घ्यावी, असे घटनेत स्पष्टपणे नमूद केले असताना त्या कलमाला बगल देणारे निवडणूक अधिकारी वादात सापडले आहे. त्यामुळे निवडणूक संपली तरी वादाचे कवित्व थांबायला तयार नाही. काल-परवाच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे यंदा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढले. नियोजनबद्धपणे केलेले डावपेच, सत्तापदांचा जमेल तेथे झालेला स्वैर वापर, पूर्वग्रह दूषित वृत्तीने घेतलेले काही निर्णय यामुळे एकूण निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या गर्तेत सापडली. पोस्टरबाजी, फलकबाजी, जेवणावळीने या साहित्यक्षेत्राशी संबंधित निवडणुकीला स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रूप प्राप्त करून दिले होते. निवडणुकीत पहिल्यांदाच सावानाच्या आखाड्यात उतरलेल्या ‘जनस्थान पॅनल’ने एकमेव जागा मिळविली असली तरी या जागेवर मात्र फेरमतमोजणीची टांगती तलवार कायम आहे. जनस्थान पॅनलकडून करण्यात आलेल्या प्रचारयंत्रणेमुळे ही निवडणूक गाजली असली तरी जनस्थान पॅनलचे समर्थक मात्र हे या मतदानाचे मतदार नव्हते आणि जे मतदार होते ते जनस्थानमधील ‘महारथीं’ना ओळखत नव्हते. जनस्थान पॅनलने सुरवातीपासूनच कलाकारांचे पॅनल म्हणून निवडणूक लढविली असली तरी या पॅनलमध्ये मात्र चारच कलाकार होते. इतर त्या-त्या क्षेत्रांतील ‘किमयागार’ मतदारांच्या पसंतीस उतरू शकले नाहीत. कुठलीही निवडणूक लढविताना ऐनवेळी तयारी ही आत्महत्त्याच असते. त्याचा प्रत्यय सावानाच्या निवडणुकीत जनस्थान पॅनलच्या रूपाने बघायला मिळाला. ग्रंथमित्र पॅनलमधील व्यूहरचनाकारांकडून मात्र गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून या निवडणुकीसाठी तयारी सरू होती आणि त्याचाच परिणाम ‘पॅनल टू पॅनल’ मतदान होऊ न अखेर ग्रंथमित्र पॅनलला अठरा पैकी सतरा जागांवर विजय मिळविता आला. नाही म्हणायला जनस्थान पॅनलने ग्रंथमित्रला जोरदार टक्कर देत घाम फोडला होता. एक पर्यायही पुढे आला होता. जनस्थान पॅनलला या निवडणुकीने खूप काही शिकता आले. परंतु नुसते कट्ट्यावर बसून, चार-दोन कार्यक्रम करत, व्हॉट््सअॅपवर एकमेकांना अंगठे दाखवित आणि आपली बौद्धिकता पाजळत आपण जनमानसात लोकप्रिय झाल्याचा आव आणून चालत नाही. त्यासाठी कष्ट झेलावे लागतात आणि प्रतिमाही उंचावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जनस्थानमधील काही कलावंतांना असे कुणाबरोबर फरपटत जाणे त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारेही ठरले. यावर्षीच्या निवडणुकीत सावानाचे ३५००-३६०० मतदार असताना जनस्थानने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रचार करून अमर्याद लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा आहे त्याच मतदारांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे होते. अतिआत्मविश्वास आणि आपण राबवत असलेली प्रचाराची पद्धतच योग्य आहे या अविर्भावामुळे जनस्थान पॅनलला फटका बसला असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.पॅनल निर्मिती करताना उमेदवारांची केलेली बांधणी हेदेखील ग्रंथमित्र पॅनलचे वेगळे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. पूर्वाश्रमीच्या ग्रंथमित्र पॅनलचे असलेले उमेदवार यावर्षी मात्र विरोधात जाऊन बसल्याने अनेक हेवेदावे बाहेर आले आणि याचाच एक भाग म्हणजे सुरेश गायधनी यांच्याकडे असलेली नाट्यगृहाची थकबाकी नाट्यमय घडामोडींनी वसूल झाली. निवडणुकीसाठी अर्ज सादर करताना निवडणुकीची आचारसंहिता तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या घटनेबाबत उमेदवारांना माहिती दिली असती तर अर्ज माघारी प्रक्रियेपर्यंत निर्माण झालेले अनेक वाद शमले असते.अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकाच वेळी चाळीस उमेदवारांनी माघार घेतल्याने ग्रंथमित्र पॅनलने आखलेली व्यूहरचना अर्धी यशस्वी झाल्याचे मानले जात होते. ही निवडणूक सार्वजनिक वाचनालयालादेखील खूप काही शिकवून देणारी ठरली. मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रचारामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आणि यामुळेच वाचनालयालादेखील मतपेट्या आयात कराव्या लागल्या. सावानावर जनस्थानची सत्ता आली असती तरी काही वेगळे पाहायला मिळाले नसते आणि ग्रंथमित्रने झेंडा रोवला असला तरी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह चिकटले आहे. त्यामुळे कोण जिंकले, कोण हरले यापेक्षा सावानाचे भले व्हावे, हीच सामान्य सभासदांची अपेक्षा असणार. विविध कारणांनी सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक गाजली असली तरी मतदारांनी ग्रंथमित्र पॅनलवर टाकलेला विश्वास आणि आपल्या जाहीरनाम्यातून कबूल केलेल्या गोष्टी पूर्णत्वास नेणे हेच १७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रगतीच्या दृष्टीने आणि नाशिकच्या साहित्यक्षेत्राचा मार्ग आणखी प्रशस्त करण्यासाठी हितकारक ठरेल.
कोण हरले, कोण जिंकले, सावानाचे व्हावे भले !
By admin | Updated: April 9, 2017 00:07 IST