ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ - नवीन वर्षाची पहाट उजाडल्यापासून नाशिकमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र होत आहे. डिसेंबर महिन्यात हंगामातील सर्वात निचांकी ७.५ तपमान नोंदविले गेले होते; मात्र ही विशेष नोंदही बुधवारी (दि.७) मोडित निघाली. राज्यात सर्वाधिक निचांकी तपमान नाशिकला (७.३) नोंदविले गेले. हंगामातील नाशिकला सर्वात कमी तपमानाची नोंद शनिवारी (दि.७) हवामान खात्याने केली.
थंडीच्या हंगामातील नाशिकचे सर्वांत नीचांकी तपमान १० डिसेंबरला ७.५ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर प्रथमच शनिवारी (दि. ७) शहराच्या किमान तपमानाचा पारा ७.३ अंशापर्यंत घसरला. गेल्या बुधवारी (दि.४) तपमान ७.९ अंश नोंदविले गेले होते. आठवडाभरापासून सातत्याने नाशिकच्या थंडीमध्ये वाढ होत असून नाशिककर गारठले आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवत आहे. निफाडला सध्या पारा ५ अंशापर्यंत घसरला आहे. एकु णच वाढत्या थंडीमुळे नाशिकचे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहे. द्राक्षाबागांच्या सुरक्षिततेसाठी द्राक्षमळ्यात बागांवर कापडी अच्छादन टाकले गेल्याचे चित्र शहरालगतच्या खेड्यांमध्ये बघावयास मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून नाशिक राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून आघाडीवर आहे. अचानकपणे वेगाने किमान तपमानाचा पारा घसरण्याची हंगामातील ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककर घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. दुचाकी चालविताना नागरिकांकडून अधिक काळजी घेतली जात आहे. हातमोज्यांपासून चेहºयासह डोक्याचेदेखील पूर्णपणे संरक्षण होण्यासाठी मफलर, मंकी टोपी नागरिकांकडून वापरली जात असल्याचे चित्र आहे.