इंदिरानगर : श्रीरामनगर येथील भंगार बाजार आणि लघुउद्योगांमुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या भंगार बाजाराला राजकीय पाठबळ असल्याची चर्चा असून, त्यामुळेच अतिक्रमण काढले जात नसल्याचे बोलले जात आहे. श्रीरामनगरमध्ये कॉलनी, बंगले व अपार्टमेंट असून, शेकडोच्या संख्येने लोकवस्ती आहे. यामध्ये नोकरदार व व्यावसायिक वास्तव्यास आहेत. भरलोकवस्तीत कोणतीही परवानगी नसताना सर्रासपणे भंगाराची गुदामे वाढत आहेत. त्या ठिकाणी दिवसभर भंगार सामानाची ने-आण मोठमोठ्या वाहनांद्वारे करण्यात येते. तसेच नको असलेले भंगार गुदामाच्या बाहेर साचविण्यात येऊन नंतर भंगार जाळण्यात येते. त्यामुळे परिसरात नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. तीच परिस्थिती कोणतीही परवानगी नसतानाही सुमारे सात वर्षांपासून भरलोकवस्ती तीन ते चार लघुउद्योग सुरू आहेत. त्यातूनही चिमणीद्वारे धूर बाहेर सोडण्यात येत असल्याने वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. भंगार बाजार आणि लघुउद्योगांच्या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांना घराची दारे, खिडक्या उघडणे मुश्किल झाले आहे. तसेच प्रदूषणामुळे घसा, नाक, डोळे आणि पोटाच्या विकारात वाढ होत आहे. त्यामुळे तातडीने अनधिकृत भंगार बाजार आणि लघुउद्योेग बंद करण्याची मागणी होत आहे. येथील अनधिकृत भंगार व्यावसायिक आणि छोट्या उद्योगांना नोटीस बजाविण्यात येऊनही अतिक्रमण काढले जात नाही. येथील व्यावसायिक प्रशासनाला जुमानत नसल्याने अनधिकृत भंगार गुदामे वाढतच आहेत. (वार्ताहर)
भंगार बाजारातील प्रदूषणाने अधिक धोका
By admin | Updated: April 26, 2016 23:49 IST