नाशिक : एकमेव स्टार प्रचारक. ७५ टक्के नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने खचलेले मनोधैर्य. स्थानिक स्तरावर प्रभावी नेतृत्वाचा अभाव. राजकारणाबाबत अननुभवी कार्यकर्त्यांची फळी. अशा पराभूत मानसिकतेत निवडणुकीच्या तोंडावर उद्योजकांच्या खिशात हात घालून केलेल्या दोन-चार प्रकल्पांचे भांडवल करत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नाशिककरांना दुसऱ्या पर्वाचे स्वप्न दाखविले, परंतु दरवेळी नवीन चित्रपटाचा खेळ पाहणाऱ्या नाशिककरांनी मनसेच्या थिएटरसमोरील ‘हाऊसफुल्लं’चा फलक काढून तो भाजपाच्या थिएटरसमोर लावून ठेवला. त्यातून मनसेची संख्या ४० वरून पाचवर आली. सन २०१२ मध्ये चाळीस नगरसेवक निवडून येत सत्तारूढ झालेल्या मनसेने नाशिककरांना नवनिर्माणाचे सुरुवातीपासून जे काही स्वप्न दाखविले, ते प्रत्यक्षात उतरवताना पक्षाची दमछाक झाली आणि राज यांनी ज्यांच्या हाती सत्तापदे सोपविली ते कचखाऊ निघाल्याने पक्षाची वाताहत झाली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ३० नगरसेवक सोडून गेले. उद्योजकांना हाताशी धरून जे काही प्रकल्प साकारले त्यांचे प्रभावी ब्रॅँडिंग करण्यात स्थानिक नेतेमंडळी कमी पडली. महापालिकेच्या माध्यमातून ठोस अशी कामगिरी नाही. ना उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न, ना सुशासन. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडूनआलेल्या निधीतून झालेले घाट-रस्ते-सुशोभिकरण. अन्य कामांसाठी कर्जदार झालेली महापालिका. असे वास्तव असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा नवनिर्माणाची भाषा करून पाहिली. राज ठाकरे यांच्या सभेने थोडेफार मनोधैर्य वाढविले होते, परंतु गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही, हीच खरी मनसेबाबत शोकांतिका आहे. त्यातल्या त्यात राज यांनी विकासकामांचे सादरीकरण दाखवतानाच शहराला भेडसावणाऱ्या कपाट, टीडीआरच्या प्रश्नाला हात घातल्याने पक्षाविषयी थोडीफार धुगधुगी वाढली होती. परंतु, ‘माझा शब्द’ म्हणवताना राज यांनी जे अस्तित्वात आहे त्यालाच नवीन वेष्टन लावून सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याऐवजी नवनिर्माणाची परिभाषा समजावून सांगताना आणखी नवीन काय करणार, यावर भर दिला असता तर आणखी दोन-पाच जागा हाती येऊ शकल्या असत्या.
खचलेल्या मनसेचे थिएटर रिते
By admin | Updated: February 26, 2017 00:06 IST